म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजी नगर आणि दीपक नगर परिसरात गुरुवारी रात्री काही हुल्लडबाज तरुणांच्या टोळीने १५ दुचाकी आणि दोन रिक्षांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र अचानक घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांना लक्ष्य केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
अंबरनाथ पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून घराबाहेर पार्क करून ठेवलेल्या नागरिकांच्या दुचाकी चोरी करण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे रात्री वाहने घराबाहेर असल्याने आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यात गुरुवारी नागरिकांनी दसऱ्यानिमित्त स्वत:च्या वाहनांची मनोभावे पूजा करत वाहने सजवली होती, मात्र दसऱ्याच्याच दिवशी अंबरनाथ पश्चिम भागातील बालाजी नगर आणि दीपक नगर परिसरात मध्यरात्री घराशेजारी पार्क करून ठेवलेल्या वाहनांना काही हुल्लडबाज तरुणांच्या टोळीने लक्ष्य केले आहे. १० ते १५ जणांच्या टोळीने १५ हून अधिक दुचाकींची लोखंडी रॉडने आणि लाकडी दांडक्याने तोडफोड केली. तसेच, दोन रिक्षांच्या काचा फोडल्या. या सगळ्या प्रकारामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सणोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे रहिवाशी भीतीच्या वातावरणात राहत आहेत. ही टोळी गेल्या काही दिवसांपासून या भागात अशाच प्रकारे दहशत माजवीत नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, रात्री नोकरी, क्लासवरून येणाऱ्या अनेक महिला आणि तरुणींची छेड काढत असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त वाढवून या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाहनांच्या तोडफोडीप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.