म. टा. वृत्तसेवा, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १५० रुग्णांना मागील २४ तासांत घरी सोडण्यात आले असून आजपर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. रविवारी नव्याने २९ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १४२७वर पोहोचली. ५७५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. पालिका क्षेत्रातील आणखी तीन ज्येष्ठ नागरिकांना करोनामुळे जीव गमवावा लागल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ४० झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांत दररोज ६० ते ७० रुग्ण सापडत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती, मात्र रविवारी रुग्णांचा आलेख घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी पालिका क्षेत्रात २९ नवे रुग्ण आढळले असून यातही कोणतीही लक्षणे नसलेल्या तसेच अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मागील २४ तासांत विविध रुग्णालयांतून तब्बल १५० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने करोनामुक्त रुग्णांचा आकडा ८१२वर पोहोचला आहे. यामुळे पालिका क्षेत्रातील ५७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कल्याण पश्चिमेकडील रोहिदास वाडा येथील ७५ वर्षीय महिलेचा, कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केटजवळील ७० वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात, तर कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली परिसरातील ६१ वर्षीय महिलेचा शास्त्रीनगर रुग्णालयात मृत्यू झाल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४०वर पोहोचली आहे. सध्या ५७५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.