संचमान्यतेमध्ये होणार दुरूस्ती
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
संचमान्यतेमुळे ठाण्यातील सुमारे २१ शिक्षकांवर गेल्या तीन वर्षांपासून उपासमारीची वेळ आली होती. मात्र गेल्याच महिन्यात न्यायालयाने याबाबचा प्रश्न निकाली काढत अर्धवेळ शिक्षकांचे वेतन फरकासह अदा करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. तसेच संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करण्यात येणार असून जानेवारीपासून त्यांना वेतन सुरू होणार आहे.
सरकारने संचमान्यता लागू केल्यानंतर २०१६ पासून माध्यमिक शाळांमधील अर्धवेळ शिक्षकांचे वेतन बंद करण्यात आले होते. संचमान्यतेमध्ये अर्धवेळ हे पदच नसल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून अर्धवेळ शिक्षकांचे वेतन दिले जात नव्हते. काही शाळांमध्ये अशा शिक्षकांना घेण्यासही नकार दिला जात होता. तर काही शिक्षक आज ना उद्या वेतन मिळेल या अशेवर अर्धवेळ काम करून पैशासाठी कोणी पेपर टाकण्याचे काम केले तर कोणी इडली विकण्याचे काम केले. अनेक शिक्षकांवर उपवासमारीची वेळ आल्यानंतर शिक्षक सेनेचे प्रांत अध्यक्ष ज. मु. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे व पालघरमधील २५ अर्धवेळ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली.
डिसेंबर महिन्यात याबाबतचा निकाल लागला असून २१ अर्धवेळ शिक्षकांचे थकीत वेतन फरकासह अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच संचमान्यतेमध्ये दुरुस्ती करून त्यामध्ये अर्धवेळ हे पद समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जानेवारीपासून या अर्धवेळ शिक्षकांना वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे.
तीन वर्षांपासून ठाण्यातील अर्धवेळ शिक्षकांच्या वेतनाचा विषय न्यायप्रविष्ट होता. याबाबत अखेर निकाल लागला असून जानेवारी महिन्यापासून त्यांना फरकासह वेतन देण्यात येणार आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील २५ पैकी २१ शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे, अध्यक्ष, कोकण विभागाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
………………