अंबरनाथ : येथील कल्याण-बदलापूर मार्गावर असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपावर एका टेम्पोतून १० टन प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. बंदी असूनही प्लास्टिकच्या साठ्याची वाहतूक होत असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नगरपालिकेच्या पथकाने पेट्रोल पंपावरील टेम्पोची तपासणी केली असता, त्यात १० टन प्लास्टिकचा साठा आढळून आला आहे. हा साठा जप्त करण्यात आला असून दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
राज्यात प्लास्टिकबंदी लागू होऊन वर्षभराहून अधिक कालावधी उलटला आहे. तरीही छुप्या पद्धतीने अंबरनाथ, उल्हासनगर शहरात काही ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन आणि साठा केला जात असल्याचे प्रकार समोर आले होते. उल्हासनगरच्या दिशेने निघालेल्या एका टेम्पोत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा असल्याचा दूरध्वनी आरोग्य विभागाचे अधिकारी सुरेश पाटील यांना आला. त्यांनी त्या माहितीनुसार संबंधित टेम्पोची तपासणी केली असता, त्यात १० टन प्लास्टिकचा साठा असलेल्या गोण्या आढळून आल्या. नगरपालिकेच्या पथकाने हे सर्व प्लास्टिक जप्त करत, ते अंबरनाथ नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट येथील शेडमध्ये जमा केला.
हा टेम्पो उल्हासनगर येथील भाग्यश्री ट्रान्सपोर्ट येथून निघाला होता व तो मिरज सांगली आणि सातारा येथे पाठवण्यात येणार होता. मात्र हा माल नेमका कोणाला विकण्यात येणार होता याबाबत टेम्पोचा वाहन चालक रवींद्र गाडे याच्याकडे पावती आढळली नाही. या प्रकरणी टेम्पो चालकाकडून पाच हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. जप्त प्लास्टिकची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली.
फेरीवाले मोकाट
नगरपालिकेच्या पथकाने मोठी कारवाई करत १० टन प्लास्टिक जप्त केले असले तरी अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांतील फेरीवाले सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसतात. त्यामुळे या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.