अ‍ॅपशहर

३० विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

आरटीई योजनेच्या पहिल्या फेरीत ऑनलाइन पद्धतीने निवड होऊनही शाळेत गेल्यानंतर यादीत नाव नसल्याने प्रवेश होणार नाही, असा धक्का तब्बल ३० पालकांना देण्यात आला आहे

Maharashtra Times 20 May 2018, 7:57 am
सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलमधील प्रकार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school RTE


आरटीईअंतर्गत ऑनलाइन निवड, तरी प्रवेशाला नकार

तांत्रिक अडचणीमुळे रिक्त जागा अधिक दाखवल्याचा दावा

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

आरटीई योजनेच्या पहिल्या फेरीत ऑनलाइन पद्धतीने निवड होऊनही शाळेत गेल्यानंतर यादीत नाव नसल्याने प्रवेश होणार नाही, असा धक्का तब्बल ३० पालकांना देण्यात आला आहे. ठाण्यातील सरस्वती इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये आरटीई योजनेत प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या पालकांना तांत्रिक अडचणीमुळे रिक्त जागा चुकीच्या दाखवल्या गेल्याने तीसऐवजी केवळ पाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील, असा पवित्रा शाळेने घेतला आहे.

दरवर्षी गोंधळाचा नवा अध्याय दाखवण्याऱ्या आरटीई योजनेत यंदा पहिल्या फेरीपासूनच पालकांच्या मनस्तापाला सुरुवात झाली आहे. पहिली फेरी सुरू झाल्यापासूनच शाळांचा मनमानी कारभार, त्यावर प्रशासनाचा नसलेला अंकुश हे चित्र दिसून आले. अनेक शाळांनी केलेली आर्थिक मागणी, पालकांच्या खिशाला बसणारी कात्री, बेकायदा वसूल केलेली फी या सर्वच प्रकरणात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. मात्र पहिली फेरी संपून तब्बल दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी शहरातील तब्बल तीस विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ठाण्यातील सरस्वती इंग्लिश प्री स्कूल येथे पहिल्या इयत्तेसाठी विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाली. ऑनलाइन प्रणालीनुसार पालकांना या शाळेतील रिक्त जागांवर प्रवेश घेता येतील, असा मेसेज देण्यात आला. त्यानुसार पालकांनी शाळेकडे प्रवेशासाठी धाव घेतली. अनेक पालकांनी यापूर्वी इतर काही शाळांमध्ये प्रवेश घेतले होते. मात्र या नामांकित शाळेत प्रवेश मिळाल्याने त्यांनी आधीच्या शाळेतून प्रवेशाचा दाखला रद्द करत या शाळेत प्रवेश घेण्याचे निश्चित केले. मात्र प्रवेशासाठी शाळेत गेलेल्या पालकांच्या पदरी चांगलीच निराशा आली. सर्व कागदपत्रांसह शाळेते गेलेल्या पालकांना या शाळेत प्रवेश होणार नसल्याचे शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. सरकारकडून प्रवेशाचा मेजेस येऊनही प्रवेश नाकारणाऱ्या शाळेला पालकांची जाब विचारला. मात्र शाळेत फारशा रिक्त जागा नसून ऑनलाइन प्रणालीतील काही तांत्रिक चुकांमुळे रिक्त जागांची संख्या अधिक भरली गेल्याची सबब शाळेने दिली. शाळेच्या अथवा तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्याचे प्रवेश होणार नाहीत हा धक्का पचवणे पालकांना शक्य नसल्याने त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही या वृत्ताला दुजोरा दिला. शाळेकडून झालेल्या तांत्रिक चुकीमुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांची संख्या दाखवली जात आहे. मात्र या सर्व प्रकरणात पालक अथवा विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश योग्य नसल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला आहे. याबाबत शाळेला नोटीस पाठविली असली तरी शाळेकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

अधिकृतरित्या यादीत नाव लागल्यानंतर केवळ कोणाच्या तरी चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळणे योग्य नाही. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश याच शाळेत करणे अनिवार्य आहे. शाळेकडून तसे केले जात नसेल तर प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लाड गायकवाड, पालक प्रतिनिधी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज