ठाणे : घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलजवळ मोटरसायकल घसरल्यामुळे मोटरसायकलवरील पाच वर्षांच्या आरुष राजेश जाधव या मुलाचा टँकरखाली येऊन जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद चितळसर-मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. भिवंडीमधील कशेळी परिसरातील मैत्री पार्क येथे राजेश जाधव यांचे कुटुंबीय राहत आहे. शुक्रवारी राजेश जाधव हे मोटरसायकलवरून त्यांची पत्नी दर्शना जाधव व पाच वर्षांचा मुलगा आरुष जाधव यांच्यासह ठाणे ते घोडबंदर असा प्रवास करत होते. घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलजवळ दुचाकी घसरल्यामुळे आरुषचा बाजूने जाणाऱ्या ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या टँकरच्या मागील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे. राजेश जाधव व दर्शना जाधव हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.