४२ अंगणवाडींच्या दुरुस्तीला मंजुरी, ४ कोटींचा निधी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
ठाण्यातील तब्बल ७२ अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यापैकी ४२ अंगणवाडी इमारतीच्या दुरुस्तीसाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर अजूनही ३० अंगणवाड्यांच्या इमारती डागडुजीच्या प्रतीक्षेत आहेत.
पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य यासह सुविधा देऊन पुढची पिढी कार्यक्षम करण्यासाठी अंगणवाडीचे मोठे योगदान असते. आजही अनेक अंगणवाड्यांमधील बालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही अंगणवाड्यांमध्ये खेळाचे साहित्य नाही, गळती, शुद्ध पाणी नाही, बसण्याची व्यवस्था नाही, विद्युत पुरवठा नाही, संरक्षक भिंत नाही अशा विदारक परिस्थितीचा सामना करत अंगणवाडी सेविका बालकांना सांभाळत आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण १८५४ अंगणवाड्या ग्रामीण परिसरात कार्यरत आहेत. त्यापैकी १०७९ अंगणवाड्यांची इमारत ही शासकीय मालकीची आहेत. तर ७७५ अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत नसल्यामुळे समाज मंदिर, खासगी इमारती तसेच मंदिर, हॉल परिसरात भरविल्या जातात.
यावर्षी एकूण ७२ अंगणवाड्यांची इमारत ही वापरायोग्य नसल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ४२ अंगणवाड्यांच्या डागडुजीचे काम पाऊस ओसरल्यानंतर सुरू होणार आहे. या डागडुजीसाठी जिल्हा सर्वसाधारण योजनेतून २ कोटी तर आदिवासी विकास उपाययोजनेमधून १ कोटी ९५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. तर अद्यापही ३० अंगणवाड्यांची दुरुस्ती करण्याबाबतचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात असलेल्या १८५४ अंगणवाड्यांपैकी ७२ अंगणवाड्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यापैकी ४२ अंगणवाड्या दुरुस्तीसाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला असून हे काम एक महिन्यात सुरू होईल, असे महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.