पाच विद्यापीठांतील ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तीन दिवसीय कोकण प्रदेश अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे ५४ वे अधिवेशन असून आज, शुक्रवारपासून सकाळी ११.३० वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होईल. या अधिवेशनात विविध ५ विद्यापीठांतील ५०० हून अधिक महाविद्यालयाचे सुमारे ७०० विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जागृती, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि व्यक्तिमत्व विकास यावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते होणार असून दिगदर्शक दिगपाल लांजेकर, प्रसिद्ध अभिनेते हरीश दुधाडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी. लक्ष्मण, राष्ट्रीय मंत्री आणि कोकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ उपस्थित राहतील. दरम्यान, अभाविपच्या मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा कोकण प्रांताचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
२८ डिसेंबर रोजी प्रा. मिलिंद मराठे, प्रा. विद्याधर वालावलकर, डॉ. शिरीष केदारे हे पर्यावरणपूरक शहर विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी २९ डिसेंबर रोजी, अभाविप राष्ट्रीय संघटना मंत्री आशिष चौहान हे समाज परिवर्तनाचे महाविद्यालय केंद्र या विषयावर चर्चा करणार आहेत.