दुसऱ्या टप्प्यात २५ रिक्षांना आरटीओची परवानगी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
करोनाच्या दिवसात अबोली रिक्षांनी ठाण्यात मोलाची कामगिरी केली आहे. तब्बल १२०० रुग्णांना या रिक्षा आधार ठरल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात २५ अबोली रिक्षांना ठाणे आरटीओने परवानगी दिली आहे.
लॉकडाउनच्या काळात सर्वच वाहतूक व्यवस्था बंद झाली, त्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली. रुग्णांचेही हाल झाले. यावर तोडगा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या अबोली रिक्षा मोफत सुरू करण्याची कल्पना मांडली. ठाण्यातील रुग्णांना उपचारासाठी ने-आण करण्याआठी या रिक्षा मोठा आधार ठरल्या आहेत. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात २८ मार्चपासून २५ रिक्षा कार्यरत होत्या, परंतु हा लॉकडाऊनचा काळ संपल्याने, पुन्हा नव्याने रिक्षाची परवानगी आरटीओकडे मागण्यात आली. ती देण्यात आली. सकाळी ९ ते ६ या वेळेत ही सेवा उपलब्ध आहे. ठाणे स्थानक, तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅटबरी, कापूरबावडी या परिसरात या रिक्षा उभ्या राहत असल्याची माहिती एकता रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांनी दिली.
करोनाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, म्हणून रुग्णांना रुग्णालय अथवा दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी या रिक्षा ठेवण्यात आल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रिक्षा मोफत सुरू ठेवण्याचे सांगितले. पहिला टप्पा हा २८ मार्च ते १४ एप्रिल असा होता. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात ३ मेपर्यंत या रिक्षांना परवानगी ठाणे आरटीओने दिली. आतापर्यंत सुमारे १२०० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. आता लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात तेवढ्याच २५ रिक्षा धावणार आहेत.
- विनायक सुर्वे, अध्यक्ष, एकता रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटना, ठाणे
अडचणीच्या काळात व्यक्तीला मदतीचा हात मिळतो, अशा पद्धतीने या गुलाबी रिक्षा कार्यरत आहेत. रुग्णासाठी खूप छान सेवा आहे. या रिक्षांविषयी एकही तक्रार आलेली नाही. त्यामुळे आताच्या लॉकडाउनच्या काळात परवानगी दिली आहे.
- नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे