अ‍ॅपशहर

हक्काच्या लाकडांसाठी आदिवासींचा सत्याग्रह

आदिवासींच्या हितासाठी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू असतानाच, वनाधिकाऱ्यांनी सुकी लाकडे आण‌ि वनउपज घेण्यास आदिवासींना मज्जाव केल्याच्या निषेधार्थ हजारो आदिवासींनी ‘वनविभागाकडून लाकडे विकत घेण्याचा सत्याग्रह’ पुकारत बुधवारी बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनरक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. श्रमजीवी संघटनेच्या या कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या वेळी आदिवासींना जंगलातील सुकी लाकडे व वनउपस घेण्यास यापुढे अडथळा येणार नाही, असे आश्वासन मुख्य वनरक्षकांनी दिले.

Maharashtra Times 15 Dec 2016, 3:00 am
नरेंद्र पाटील, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adivasi agitate against wood ban form sanjay gandhi national park
हक्काच्या लाकडांसाठी आदिवासींचा सत्याग्रह


आदिवासींच्या हितासाठी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू असतानाच, वनाधिकाऱ्यांनी सुकी लाकडे आण‌ि वनउपज घेण्यास आदिवासींना मज्जाव केल्याच्या निषेधार्थ हजारो आदिवासींनी ‘वनविभागाकडून लाकडे विकत घेण्याचा सत्याग्रह’ पुकारत बुधवारी बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनरक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. श्रमजीवी संघटनेच्या या कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या वेळी आदिवासींना जंगलातील सुकी लाकडे व वनउपस घेण्यास यापुढे अडथळा येणार नाही, असे आश्वासन मुख्य वनरक्षकांनी दिले.

मुख्य वनरक्षक तथा संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या कार्यक्षेत्रातील येऊर आणि गोखीवरे वनपरिक्षेत्रात वनहक्क कायद्यानुसार आदिवासींचा हक्क असलेली जंगलातील सुकी लाकडे आणि वनउपज घेण्यासाठी वनअधिकाऱ्यांकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाकडूनच लाकडे विकत घेण्याचा अनोखा सत्याग्रह पुकारला होता.

‘जंगल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी’, ‘माणुसकीची भीक नको, हक्क हवा-हक्क हवा’ या आणि अशा गगनभेदी घोषणा देत श्रमजीवी संघटनेच्या हजारो सभासद कार्यकर्त्यांनी बुधवारी बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा आसमंत दणाणून सोडला. या वेळी वनविभागाने जळणासाठी लाकडे आणि जंगलातील वनउपज घेण्यास लादलेल्या अन्यायकारक बंदीचा या वेळी निषेध करण्यात आला. या सत्याग्रहासाठी वसई, ठाणे तालुक्यांसह आणि मुंबई उपनगर भागातून जमलेल्या हजारो श्रमजीवी आदिवासींच्या सहभागामुळे संजय गांधी नॅशनल पार्कच्या गेटसमोरील नॅशनल हायवेवर सुमारे तासभर तुडुंब गर्दी झाली होती. या सत्याग्रहातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करत नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज