अ‍ॅपशहर

सुविधा कमी, समस्या जास्त!

अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असली तरी शहरातील प्रवाशांची वाहतूक करणारी एकही परिवहन सेवा दोन्ही शहरांत उपलब्ध नसल्याने स्थानिकांना नाइलाजास्तव शहरातील एकमेव पर्याय असलेल्या रिक्षावर वाहतुकीसाठी अवलंबून राहावे लागते. मात्र शहरातील वाढत्या रिक्षा, त्यांचे स्टॅण्ड, मुजोरी, भाडे नाकारणे तसेच बजबजपुरीने वाहतूककोंडीची समस्या वाढत असून वाहतुकीची सुविधा कमी आणि समस्याच अधिक जाणवत आहे.

Maharashtra Times 26 Nov 2016, 3:02 am
शरद पवार, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambarnath badlapur autorikshaw dont run in decipline
सुविधा कमी, समस्या जास्त!


अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असली तरी शहरातील प्रवाशांची वाहतूक करणारी एकही परिवहन सेवा दोन्ही शहरांत उपलब्ध नसल्याने स्थानिकांना नाइलाजास्तव शहरातील एकमेव पर्याय असलेल्या रिक्षावर वाहतुकीसाठी अवलंबून राहावे लागते. मात्र शहरातील वाढत्या रिक्षा, त्यांचे स्टॅण्ड, मुजोरी, भाडे नाकारणे तसेच बजबजपुरीने वाहतूककोंडीची समस्या वाढत असून वाहतुकीची सुविधा कमी आणि समस्याच अधिक जाणवत आहे.

शहर विकसित होत असताना त्या शहरातील नागरिकांना त्या दर्जाच्या सुविधा मिळणे अपेक्षित असते. मात्र अंबरनाथ, बदलापूर ही दोन्ही शहरे विकसित आणि विस्तारित होत असताना शहरात वाहतुकीसाठी पालिकेची कुठलीही परिवहन सेवा नसल्याने स्थानिकांना एकमेव रिक्षा या वाहतूक सुविधेवर अवलंबून राहावे लागत आहे. शहरात परवानाधारक आणि विनापरवानाधारक असे दोन गट अनेक रिक्षाचालकांमध्येच निर्माण झाले असून, वाढत्या रिक्षांना शहरात कुठेही अधिकृत स्टॅण्ड नाहीत. त्यामुळे अनेक रिक्षा या स्टेशन परिसरात आधीच असलेल्या बजबजपुरीत भर घालत बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ स्टेशन परिसरात बेशिस्तपणे उभ्या केलेल्या रिक्षांमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडीत भर पडत असते.

वाहतूक पोलिसांकडून विनापरवानाधारक आणि नियम मोडणाऱ्यांवर नियमित कारवाई होत नाही. अंबरनाथमध्ये अनेक नवीन गृहप्रकल्प उभे राहत असल्याने चिखलोली, मोरीवली पाडा, एमआयडीसी, जावसई आदी भागांत रिक्षाचालक जाण्यास टाळाटाळ करत असतात. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव रात्री-अपरात्री पुढील अंतर पायी कापण्याची अथवा दुप्पट पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागते.

बदलापूर पश्चिम भागात वैशाली टॉकीजजवळ संध्याकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिक्षाचालकांच्या रांगा लागल्याने नागरिकांना आणि अन्य वाहनांना मार्गच काढता येत नसून रिक्षाचालकांची मुजोरी वाढत आहे. तर, पूर्व भागात स्कायवॉकखाली रिक्षाचालकांमध्ये भाडे मिळवण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळते. रिक्षाचालकांमध्येच अनेकवेळा हाणामारीच्या प्रसंगामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तर, वाहतूक पोलिस केवळ शिट्टी वाजवत हतबल अवस्थेत पाहायला मिळत असल्याने प्रवाशांच्या हालात भरच पडत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज