अ‍ॅपशहर

'आनंदाचा शिधा' वाटप सुरु; सहा लाख रेशनकार्डधारक, मात्र ४० टक्के शिधा उपलब्ध

सध्या केवळ ४० टक्केच शिधा उपलब्ध झालेला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्णपणे शिधा आलेला नसल्याने मोठ्या प्रमाणावर रेशनकार्ड धारक आनंदाचा शिधापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 21 Oct 2022, 9:13 am
ठाणे : दिवाळी जवळ आली तरी रेशन दुकानातून नागरिकांना शंभर रुपयांमध्ये पामतेल, साखर, रवा आणि चणाडाळ या चार वस्तूंच्या किट वाटपाला सुरुवात झाली नव्हती. याबाबत नुकतेच 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आंनदाचा शिधा कधी? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अखेर गुरुवारपासून रेशनिंगच्या ठाणे विभागामध्ये रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळू लागला. मात्र, रेशनकार्ड धारकांची संख्या सहा लाखांच्या पुढे असून या संख्येच्या तुलनेत सध्या केवळ ४० टक्केच आनंदाचा शिधा उपलब्ध झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anandacha shidha
'आनंदाचा शिधा' वाटप सुरु; सहा लाख रेशनकार्डधारक, मात्र ४० टक्के शिधा उपलब्ध


आनंदाचा शिधामध्ये प्रत्येकी एक-एक किलो चणाडाळ, रवा आणि साखर तसेच एक लिटर पामतेल आदी चार वस्तूंचा समावेश आहे. गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने शासनाने या चारही वस्तूंचे किट केवळ शंभर रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. परंतु, दिवाळी अगदी जवळ आली तरी ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात झाली नव्हती. रेशनिंगच्या ठाणे विभागामध्ये (फ परिमंडळ) सहा लाखांपेक्षाही अधिक लाभार्थी कुटुंबे असून आनंदाचा शिधा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत नागरिक होते. दुसरीकडे साखर, चणाडाळ, पामतेल, रवा यांचा साठा गोदामातून रेशन दुकानांमध्ये पोहोचण्याचे काम सुरू झाले असले तरी चारही वस्तू एकत्रित आल्याशिवाय या वस्तूंचे किट वाटप करणे शक्य नव्हते. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आनंदाचा शिधा कधी? या मथळ्याखाली नुकतेच वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्तानंतर शासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्या. अखेर गुरुवारपासून रेशनिंगच्या ठाणे विभागामध्ये रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात झाली.

ठाणे, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मिरा-भाईंदर आदी भागातील रेशन दुकानातून लाभार्थ्यांना चारही वस्तूंचे किट वाटप करण्यात येत असल्याची माहिती रेशनिंगच्या अधिकाऱ्यांनी दिली. ठाण्यातील विष्णू नगरमध्ये आमदार संजय केळकर यांच्या हस्ते तसेच रेशनिंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात करण्यात आली. परंतु, 'फ' परिमंडळामध्ये अंत्योदय आणि प्राधान्य रेशनकार्ड धारकांची एकूण संख्या सहा लाखांपेक्षाही अधिक आहे. सध्या केवळ ४० टक्केच शिधा उपलब्ध झालेला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्णपणे शिधा आलेला नसल्याने मोठ्या प्रमाणावर रेशनकार्ड धारक आनंदाचा शिधापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज