म. टा. प्रतिनिधी, ठाणे
तानसा अभयारण्यात बिबळ्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोठ्या बहिणीला साहसाने वाचवणाऱ्या हाली बरफ या २० वर्षीय आदिवासी युवतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही घरासाठी संघर्ष करावा लागत होता. लग्नानंतर हाली जगण्यासाठी संघर्ष करत असल्याने तिच्या नोकरी आणि घरासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली. यंदा तिला पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर झाले असून २५ हजारांचा पहिला हप्ता मिळाला आहे. त्यातून त्यांनी जोत्याचे काम सुरू केले असून बुधवारी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी याची माहिती घेऊन घराचे पुढील काम लवकर पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर, नोकरीही मिळाल्याचे हालीने यावेळी सांगितले.
राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या लाभार्थींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी अंबरनाथ तालुक्यातील दहिवली येथील कैलास धुळे यांनी त्यांच्या घर बांधण्यादरम्यानचा प्रवास मुख्यमंत्र्यांना सांगितला. प्रधानमंत्री आवास, रमाई आणि शबरी तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागाचा लाभ घेतलेल्या निवडक १६ लाभार्थींशी फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी लाभार्थींनी त्यांचा अनुभव सर्वांसमोर मांडला. वसईजवळच्या एका इंजेक्शन, सलाईन बाटल्या तयार करणाऱ्या कंपनीत कामगार म्हणून काम करीत असलेल्या ४० वर्षीय सुनीता प्रदीप बरफ हिला भिवंडी तालुक्यातील या छोट्याशा गावाजवळ झोपडीच्या ठिकाणी हक्काचे घर मिळाले आहे. ही कल्पनाच मुळी सुनीताला स्वप्नवत होती. कमालीची गरिबी पाहिलेल्या सुनीताला स्वत:चे घर ही संकल्पनाच दुर्लभ होती. माहेरी मोलमजुरी करून केलेला संसार आणि त्यानंतर सासरीही पदरी पडलेली गरीबी याही परिस्थितीमध्ये संघर्ष करणाऱ्या या महिलेला प्रधानमंत्री आवास योजनेच्या एका अर्जामुळे जीवन बदलल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर, अंबरनाथ तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायत येथील कैलास धुळे यांना थेट मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद होता. कैलास धुळे यांना २०१६-१७मध्ये हे घर मंजूर झाले असून घरकुलसाठी १ लाख २० हजार रक्कम मिळाली तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरीसाठी १५ हजार मिळाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते.