परमेश्वरी महिला भजनी मंडळ, माजीवडा, ठाणे पश्चिम
आजच्या धकाधकीच्या जीवनात घर संसार, पाहुणचार, नोकरी, सणवार या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून यशस्वी वाटचाल करणारी ही नारीशक्ती आहे. या साऱ्या कामातून तिला थोडा विरंगुळा मिळावा म्हणून दहा वर्षांपूर्वी दहा महिलांना एकत्र करत अल्पना टिपणीस यांच्या पुढाकाराने परमेश्वरी भजनी मंडळाची स्थापना झाली. बघता बघता या अंकुराचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अध्यात्माची जोड देत सध्याच्या पिढीशी मिळते-जुळते कार्यक्रम घेत महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
परमेश्वरी महिला मंडळाची स्थापना ३० जून २००९ रोजी झाली आहे. गेल्या महिन्यात या भजनी मंडळाचा दहावा वर्धापन दिन भजनसंध्या कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण, भक्ती, भजन म्हणजे भक्तांचा निर्मळ झरा…. हे भजनीमंडळ म्हणजे नुसते मनोरंजन व भक्तीचे साधन नसून महिलांचे हे दुसरे कुटुंबच झाले आहे. नवरात्र, गणेशोत्सव सणांच्या निमित्ताने ठिकठिकाणी सेवा देण्याचाही मंडळाचा उपक्रम आहे. पारंपरिक भजनासह अभंग, गवळण, भारूड, देवीचा जागर इ. गाण्यांचे प्रकारही टाळ, पेटी, तबला यांच्या साथीने शिकविले जातात. याशिवाय राममारुती उत्सवात कल्याणला भजनी मंडळाच्या नियमित सेवा सादर होते. काही ना काही निमित्ताने कुणाच्या घरीही भजनाचा रंगतदार कार्यक्रम होतो. सध्या या मंडळात ३५हून अधिक महिला कार्यरत असतात. सर्वजण एकत्र येऊन या मंडळाची जबाबदारी सांभाळत असतात. या वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने महिला एकत्र येत मनोरंजनाचा आनंद घेतात शिवाय मनही मोकळे करतात. कोणी भगिनी तर कोणी मैत्रिण म्हणून नव्या नात्याला रूप दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच दशकपूर्ती सोहळा जयदीप सोसायटीच्या सभागृहात पार पडला. ३५ महिलांचे हे मंडळ राज्यभर भजनाचे कार्यक्रम सादर करीत असतात. या मंडळातील महिला भजनासह महिला दिन, संक्रात , चैत्रगौर, समारंभ, एखादी निसर्गरम्य ठिकाणी सहल असे विविध उपक्रम राबवित असतात. या मंडळातील महिलांनी भक्ती, मनोरंजनासोबत एकी, सामाजिक बांधिलकी व मैत्रीचा ठेवाही जोपासला जातो. त्यामुळे मंडळातील वातावरण नेहमी आनंदी व एकोप्याचे राहते. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने मंडळ दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा समारंभ साजरा केला जातो. इच्छा असूनही अनेकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, त्यामुळे या मंडळाच्या वतीने माजीवाड्यातच प्रति पंढरपूर पालखी सोहळा केला जात असल्याचे टिपणीस यांनी सांगितले.