गेल्या दोन वर्षांपासून मुबलक पाऊस पडत असल्याने ठाणे शहराला पाणीटंचाईच्या फारशा झळा सोसाव्या लागत नाहीत. आजच्या घडीला तर ठाणे शहरात गरजेपेक्षा ४९ दशलक्ष लिटर पाणी जास्त येत आहे. सदोष वितरण व्यवस्थेमुळे जवळपास ३० टक्के, म्हणजेच १५० एमएलडी पाणी वाया जात आहे. मीटर पद्धतीने पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी वापरावर कोणताही निर्बंध नाही. पाण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावरील उधळपट्टी ही भविष्यात परवडणारी नाही. ज्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेल्या धरणांची चर्चा सुरू होते. मात्र, आता त्या धरणांचे कुणी नावही काढत नाही. परंतु, पुढल्या वर्षी जर सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर वाढलेल्या लोकसंख्येची तहान भागविणे विद्यमान धरणांना शक्य होणार नाही. त्यामुळे प्रस्तावित धरणांची कामे मार्गी लावण्यासोबतच पाणी वापराला शिस्त लावणे हे अत्यावश्यक आहे. पालिकांनी आपापल्या भागांतील पाणीगळती शोधून ती रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच, महिन्याचे पाणीबिल ठोक स्वरूपात न पाठवता मीटर पद्धतीचाच अवलंब त्यासाठी व्हायला हवा. पालिकेने त्यासाठी केलेले नियोजन कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला हवी.
तहान लागण्याआधीच...
गेल्या दोन वर्षांपासून मुबलक पाऊस पडत असल्याने ठाणे शहराला पाणीटंचाईच्या फारशा झळा सोसाव्या लागत नाहीत...
Maharashtra Times 1 Aug 2018, 4:00 am