थीम पार्कच्या वादावरून आरोप प्रत्यारोप
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बहुचर्चित ठरलेल्या थीम पार्कच्या चौकशीसाठी ४७ तासांत समिती स्थापनेचा निर्णय झाला असतानाही त्यासाठी आवश्यक ठराव सत्ताधारी शिवसेनेने वेळेत केलेला नाही. त्यामुळे या भ्रष्टाचारात शिवसेना गुंतलेली असल्याचा संशय भाजपचे माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच, पालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने कंत्राटदारास सुनावणी देणे अपेक्षित असताना या वादाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त कंत्राटदार नितीन देसाई आणि संशयाची सुई असलेले कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांच्या बरोबरच आयुक्तांनी चर्चा करणे हे प्रशासकीय आदबीला शोभणारे नसल्याचे मतही पाटणकर यांनी मांडले आहे.
'मटा'ने थीम पार्कच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्यानंतर गेले १५ दिवस ठाणे शहर आणि पालिका वर्तुळात खळबळ सुरू आहे. पालिका सभागृहात या विषयावर वादळी चर्चा झाल्यानंतर ४८ तासांत चौकशी समिती नेमण्याचा ठराव झाला होता. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने ठरावच वेळेत केला नाही. चौकशी समितीत सर्वपक्षीय नगरसेवक हवे असे ठरले प्रत्यक्षात मात्र समितीत कोण आहेत, हे अजूनही गुलदस्त्यात आहे व समितीचे कामकाज सुरू होईल की नाही हे मोठे प्रश्नचिन्ह असल्याचेही पाटणकर यांचे म्हणणे आहे. तसेच, ज्या ठेकेदाराची चौकशी खुद्द शिवसेनेच्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेते नरेश म्हस्के, सभापती राम रेपाळे समितीत बसून करणार आहेत त्या कंत्राटदाराला भेटायचे पालकमंत्री, शिवसेना आमदार आणि सभागृहनेत्यांनी टाळणे आवश्यक होते, असे मतही पाटणकर यांनी मांडले आहे. तसे न झाल्याने थीम पार्क व बॉलिवूड पार्क दोन्ही कामाच्या भ्रष्टाचारात शिवसेनेच्या दबावाखालीच आयुक्तांनी निर्णय घेतले का हे त्यांनी ठाणेकरांना सांगणे जरुरीचे आहे. प्रशासनाचा कारभार पारदर्शी आहे हे आयुक्तांनी तर तसा विश्वास ठाणेकरांच्या मनात निर्माण करणे आता पालकमंत्र्यांचे कर्तव्य असल्याचेही पाटणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.