म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
ठाण्यातील उत्सवी दहीकाल्यापासून चार हात लांब असलेल्या भाजपने यंदा दहीहंडी उत्सवाच्या मैदानात उडी घेतली आहे. या उत्सवातील शिवसेनेच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील चौकात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक थर उभे करणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचे घसघशीत बक्षीस दिले जाणार असून उत्सवातील एकूण बक्षिसाची रक्कम ही ५० लाख असेल. यंदा ठाण्यात सर्वाधिक बक्षिसांचे वाटप या उत्सवात होण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपचे निम्मेअधिक मंत्री आणि नेते या उत्सवात हजेरी लावतील, अशी माहिती उत्सवाचे आयोजक असलेले स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच भाजपच्या माथाडी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली.
मराठमोळ्या दहीहंडी उत्सवाला ठाणे शहराने वेगळ्या उंचीवर नेले. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी या उत्सवाला ग्लॅमर प्राप्त करून दिले. टेंभी नाक्यावरील शिवसेनेच्या परंपरागत उत्सवासह वर्तकनगर येथे आ. प्रताप सरनाईक, जांभळी नाका येथे खासदार राजन विचारे तर रघुनाथ नगर येथे आ. रवींद्र फाटक या सेनेच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सवातील ठाण्याचा गजर कायम ठेवला. हंडी कायद्याच्या चौकटीत अडकल्यानंतर कायदा मोडून ठाण्यातील मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी गोविंदा पथकांना विक्रमी बक्षिसे दिली. या साऱ्या राजकीय दहीकाल्यात भाजपचे नेते कधीच सहभागी होत नव्हते. शिवसेना नेत्यांच्या स्पर्धेत उतरण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. मात्र, शिवाजी पाटील यांनी विक्रमी हंडीची घोषणा करत 'हमभी किसीसे कम नही' हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
भाजपच्या या उत्सवासाठी मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. सर्वांत मोठी हंडी लावणाऱ्यांना ११ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून विविध थरांना सुमारे ५० लाख रुपयांच्या पारितोषिकांची घोषणा पाटील यांनी केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार त्यांची कला येथे सादर करणार असून २ सप्टेंबर रोजी रात्री सेलिब्रेटींची दहीहंडी हे येथील आकर्षण असेल. त्यात सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रुपाली भोसले, मीरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रीती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि अन्य चार गायक कलाकार यात सहभागी होणार आहेत. या उत्सवाची घोषणा करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले आणि आमदार निरंजन डावखरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी
या उत्सवाच्या मध्यमातून केरळमधील पूरग्रस्त आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एकूण सात लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली जाणार आहे. तसेच, उच्च शिक्षण घेणाऱ्या ठाण्यातील दहा आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाईल, अशी माहिती शिवाजी पाटील यांनी दिली.
ठाण्यातील उत्सवी दहीकाल्यापासून चार हात लांब असलेल्या भाजपने यंदा दहीहंडी उत्सवाच्या मैदानात उडी घेतली आहे. या उत्सवातील शिवसेनेच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील चौकात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक थर उभे करणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचे घसघशीत बक्षीस दिले जाणार असून उत्सवातील एकूण बक्षिसाची रक्कम ही ५० लाख असेल. यंदा ठाण्यात सर्वाधिक बक्षिसांचे वाटप या उत्सवात होण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपचे निम्मेअधिक मंत्री आणि नेते या उत्सवात हजेरी लावतील, अशी माहिती उत्सवाचे आयोजक असलेले स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच भाजपच्या माथाडी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली.
मराठमोळ्या दहीहंडी उत्सवाला ठाणे शहराने वेगळ्या उंचीवर नेले. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी या उत्सवाला ग्लॅमर प्राप्त करून दिले. टेंभी नाक्यावरील शिवसेनेच्या परंपरागत उत्सवासह वर्तकनगर येथे आ. प्रताप सरनाईक, जांभळी नाका येथे खासदार राजन विचारे तर रघुनाथ नगर येथे आ. रवींद्र फाटक या सेनेच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सवातील ठाण्याचा गजर कायम ठेवला. हंडी कायद्याच्या चौकटीत अडकल्यानंतर कायदा मोडून ठाण्यातील मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी गोविंदा पथकांना विक्रमी बक्षिसे दिली. या साऱ्या राजकीय दहीकाल्यात भाजपचे नेते कधीच सहभागी होत नव्हते. शिवसेना नेत्यांच्या स्पर्धेत उतरण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. मात्र, शिवाजी पाटील यांनी विक्रमी हंडीची घोषणा करत 'हमभी किसीसे कम नही' हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
भाजपच्या या उत्सवासाठी मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. सर्वांत मोठी हंडी लावणाऱ्यांना ११ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून विविध थरांना सुमारे ५० लाख रुपयांच्या पारितोषिकांची घोषणा पाटील यांनी केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार त्यांची कला येथे सादर करणार असून २ सप्टेंबर रोजी रात्री सेलिब्रेटींची दहीहंडी हे येथील आकर्षण असेल. त्यात सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रुपाली भोसले, मीरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रीती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि अन्य चार गायक कलाकार यात सहभागी होणार आहेत. या उत्सवाची घोषणा करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले आणि आमदार निरंजन डावखरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी
या उत्सवाच्या मध्यमातून केरळमधील पूरग्रस्त आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एकूण सात लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली जाणार आहे. तसेच, उच्च शिक्षण घेणाऱ्या ठाण्यातील दहा आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाईल, अशी माहिती शिवाजी पाटील यांनी दिली.