मुख्यमंत्री प्रथमच उत्सवात सहभागी
नियमभंग करून उत्सव साजरा
मनसेने निर्माण केले स्वतःचे स्थान
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
गेली अनेक वर्षे ठाण्यात गोविंदाचा थरार सुरू असला, तरी त्यात भाजपचे 'थर' कुठेही दिसत नव्हते. मात्र, यंदा या उत्सवाच्या माध्यमातून भाजपने उत्सवाची मक्तेदारी असलेल्या शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ठाणे, भिवंडी आणि मुंबईतल्या उत्सवांना हजेरी लावली. उत्सवाचा केंद्रबिंदू भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न त्यामागे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खुद्द मुख्यमंत्रीच उत्सवस्थळी हजर असल्याने तिथल्या कायदेभंगाकडे पोलिस आणि सरकारी यंत्रणांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले.
मराठमोळ्या दहीहंडी उत्सवाला ठाणे शहराने वेगळ्या उंचीवर नेले. या उत्सवावर २०१४पर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीची मक्तेदारी होती. दहीहंडीवरील निर्बंधांमुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्सवातून माघार घेतली. त्यानंतर मनसेने कायद्याला आव्हान देत या उत्सवात आपले स्थान निर्माण केले. मात्र, त्यानंतरही शिवसेनेतर्फे पाच ठिकाणी मोठ्या स्वरूपात हा उत्सव साजरा होत असल्याने त्यांचेच वर्चस्व होते. या साऱ्या राजकीय दहीकाल्यात भाजपचे नेते कधीच सहभागी होत नव्हते. शिवसेना नेत्यांच्या स्पर्धेत उतरण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. मात्र, भाजपच्या माथडी संघटनेचे नेते शिवाजी पाटील यांनी हिरानंदानी मेडोज येथील चौकीत विक्रमी हंडीची घोषणा करून ठाण्यातल्या उत्सवात चुरस निर्माण केली. आजवर राज्याचा कोणताही मुख्यमंत्री दहिहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले नव्हते. मात्र, ठाण्यातील उत्सवात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर त्यांच्यासमोर जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामीसुध्दा दिली. मुख्यमंत्री स्वतः जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम, भारत माता की जय असा जयघोष करत होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भिवंडी आणि मुंबईतल्या गोविंदा उत्सवांमध्ये हजेरी लावत स्थानिक भाजप नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.
दहीहंडी उत्सवातील मुख्यमंत्र्यांच्या या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले आहे. नियमभंग करून हे उत्सव साजरे होत असताना मुख्यमंत्र्यांनी तिथे हजेरी लावणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच, या उत्सवांच्या उपद्रवामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनीसुध्दा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, उत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सवाचे आयोजक असलेले शिवाजी पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांना बळ देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी ठाणे महापालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, ठाण्याचे जिल्हाधिकारी असे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी यंत्रणासुध्दा हजर होती. आयोजक आणि गोविंदा पथकांकडून कायद्याचे उल्लंघन होत असले तरी या सरकारी यंत्रणांनी त्याविरोधात कारवाई करण्याची धमक न दाखवता आयोजकांकडून सन्मानचिन्ह स्वीकारण्यात धन्यता मानली.
..............
०० आव्हाडांची 'मनसे खेळी'
गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी चार वर्षांपुर्वी आपला दहीहंडी उत्सव बंद केला होता. मात्र, यंदा उत्सवाचा ज्वर पुन्हा वाढत असताना त्यापासून स्वतःला दूर ठेवणे आव्हाडांना कठीण होते. मात्र, राष्ट्रवादीचा शहरात कुठेही दहीहंडी उत्सव नसल्याने आव्हाड यांनी थेट मनसेच्या उत्सवात दाखल होत आपली हौस भागवून घेतली.