कोहोज खुंटवली टेकड्यांवरील प्रकार
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
एकीकडे राज्यातील हरितक्षेत्र वाढावे, यासाठी राज्य सरकार आणि लोकसहभागातून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवत असताना, या उपक्रमांना खीळ घालण्यासाठी झाडांना आग लावण्याचे प्रकार घडत आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील खुंटवली येथील २५ वृक्षांची लागवड केलेल्या डोंगराला आग लावल्याप्रकरणी वन विभागाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
अंबरनाथ तालुक्यात गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारच्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच नगरपालिकांच्या माध्यमातून लाखो झाडांची विविध डोंगरांच्या टेकड्यांवर लागवड करण्यात आली आहे. यात अंबरनाथ पश्चिम येथील कोहोज खुंटवली या भागातील डोंगराच्या टेकड्यांवर जुलै महिन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने भव्य वृक्षलागवडीचा उपक्रम राबवत २५ हजार झाडे लावण्यात आली होती. त्यात मंगरूळ येथील डोंगरावर लावलेल्या एक लाख झाडांच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी आग लावत सात हजार झाडे जाळून नष्ट केली आहेत. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापत असून, वन विभागावर पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांमधून मोठा रोष आहे. त्यामुळे वन विभागानेही वृक्षलागवड केलेल्या भागात अधिक पहारा वाढवत निरगाणी ठेवली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ पश्चिम भागातील कोहोज खुंटवली भागातील टेकड्यांवर जमाम (२०) आणि यार मोहम्मद हे दोन तरुण या भागातील डोंगराला आग लावताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले आहेत. वन विभागाने या दोन्ही तरुणांना अटक केली. तरुणांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच मांगरूळ भागात लावलेल्या आगीप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला, तरी वन विभाग या प्रकरणाची चौकशी करत असून अद्याप कुणालीही अटक करण्यात आलेली नाही.