इको ड्राइव्ह यंगस्टर्सचा उपक्रम
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
उन्हाळ्यात माणसांना पिण्यासाठी मिळणारे घोटभर पाणीदेखील अमृताचा आभास देते. पण रणरणत्या उन्हात पक्षी पाण्यासाठी वणवण भटकतात. म्हणूनच कल्याणातील पक्षीप्रेमींच्या 'इकोड्राइव्ह यंगस्टर्स' या संस्थेने बुधवारी मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात पक्ष्यांसाठी घोटभर पाणी हा उपक्रम राबविला आहे.
वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. उन्हाळा सुरू झाल्यावर सामान्य माणसापासून प्राण्यापर्यंत सगळ्यांनाच चटके बसू लागल्याने प्रत्येक जण पाणी अथवा थंडाव्याच्या शोधात असतो. अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे माणसाच्या या गरजा तत्काळ पूर्ण होतात. मात्र, प्राणी व पक्षी यांना नैसर्गिक स्रोतांमधूनच या गरजा भागवाव्या लागत असल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात. उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते. उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकणे अथवा मृत्यू होणे, असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडतात. तसेच एखाद्या प्राणीमित्राने ठेवलेले पाणी पक्षी खराब करतील, या उद्देशाने अनेक जण ते पाणी ओतून टाकतात. त्यामुळेही पक्ष्यांना पाणी मिळत नसल्याचे प्रणीमित्रांच्या निदर्शनास आले आहे. यंदा मार्चपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने कबूतर, कोकिळा, घुबड, पोपट, सी-गल्स, घार या पक्ष्यांना उन्हाचा त्रास असह्य होऊ लागला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्धार इकोड्राइव्ह यंगस्टर्सने केला आहे. प्रत्येकाने या पक्ष्यांसाठी घोटभर पाणी या उपक्रमात सहभागी होत उपक्रमाला हातभार लावावा, ज्यामुळे शहरात पाण्याअभावी पक्ष्यांना जीव गमवावा लागणार नाही, असे असे आवाहन 'इकोड्राइव्ह यंगस्टर्स' संस्थेचे पदाधिकारी महेश बनकर यांनी केले आहे.