म. टा. वृत्तसेवा, पालघर डहाणू तालुक्यातील चिंचणी व पालघर तालुक्यातील तारापूर ही गावे दोन्ही तालुक्याला लागून असून, गावाजवळील बायपास सागरी महामार्गावर तारापूरच्या खाडीत चिंचणी ग्रामपंचायत आपल्या गावातील सार्वजनिक कचरा उघड्यावर टाकत असल्याने या कचऱ्याची दुर्गंधी तारापूरच्या ग्रामस्थांना डोकेदुखी ठरत आहे. मोठ्या प्रमाणात चिंचणी ग्रामपंचायत कचरा उघड्यावर टाकत असल्याने तो कचरा खाडीतील पाण्यात कुजतो, तर भरतीच्या वेळी कचरा पाण्यावर तरंगत तारापूर गावाच्या खाडीलगत असलेल्या मोहल्ल्याच्या किनारी लागतो. या कुजलेल्या कचऱ्यामुळे तारापूर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान गाव पातळीवर राबवित असताना चिंचणी ग्रामपंचायत केंद्र सरकारचे नियम धाब्यावर बसवून तारापूर ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहे बऱ्याचदा कचरा खाडीकिनारी रस्त्याच्या कडेला टाकतात व पेटवून देतात त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीयुक्त धूर वातावरणात पसरल्याने परिसरातील ग्रामस्थांना दमा, सर्दी, खोकला व दुर्धर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेटलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता आहे. तारापूर ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तारापूर हद्दीतील खाडीत चिंचणी ग्रामपंचायत व तारापूर ग्रामपंचायतीने खाडीकिनारी कचरा टाकल्यास संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ केली आहे. (फोटो : तारापूरच्या खाडीत चिंचणी ग्रामपंचायत आपल्या गावातील सार्वजनिक कचरा उघड्यावर टाकत आहे - उषा पाटील) ,,,,
चिंचणीतील कचऱ्याने कोंडलातारापूरवासीयांचा श्वास
म टा...
MT 15 Mar 2019, 4:00 am