म. टा. वृत्तसेवा, वसई
वसई जनता सहकारी बँकेचा धर्मादाय निधी वाटप कार्यक्रम गणपतराव वर्तक क्रीडा भवन येथे नुकताच पार पडला. बँकेकडून संपूर्ण धर्मादाय निधी पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, तलासरी, डहाणू, पालघर या तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी संस्थाना वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसईचे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ होते. तर विशेषअतिथी म्हणून बँकेचे संस्थापक संचालक व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बांदेकर, बँकेचे माजी अध्यक्ष यशवंत पाटील व माजी उपाध्यक्ष रामभाऊ राऊत उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष महेश देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात बँकेच्या गेल्या ४४ वर्षांचा आढावा घेतला. बँकेने २००९पासून केलेल्या कामगिरीची माहिती उपस्थितांना त्यांनी दिली. बँकेने मागील नऊ वर्षांत कर्जवाढीमध्ये तसेच ठेवी संकलनात व विशेष करून अनुत्पादित कर्जावर नियंत्रण मिळविण्यात केलेल्या कामगिरीबद्दल माहिती दिली. बँकेच्या या यशाचे श्रेय सहकारी संचालक, अधिकारी व सेवकवर्ग यांना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेने अत्याधुनिक संगणकीय कार्यप्रणाली बँकिंग कामकाजात कार्यान्वित केली असून लवकरच उच्च प्रतीची मोबाइल बँकिंग सेवा चालू करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वसई जनता सहकारी बँकेच्या धोरणामध्ये नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगत ग्राहकांशी संवाद साधला.
आदिवासी परिसरातील आश्रमशाळा, अनाथाश्रम, वाचनालये आदी क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या संस्थाची धर्मादाय निधीसाठी निवड करण्यात आली. बँकेचे माजी अध्यक्ष यशवंत पाटील यांनीही विचार मांडले. बँकेने शक्यतो सर्व शाखा टप्प्या टप्प्याने मालकी हक्काच्या कराव्यात, असे त्यांनी सांगितले. तर भाऊसाहेब मोहोळ यांनी बँकेच्या धर्मादाय निधी वाटप यासारख्या उपक्रमाबद्दल संचालक मंडळाला धन्यवाद दिले व आदिवासी दुर्गम भागातील बँकेचे हे कार्य म्हणजे दीनदलित व आदिवासीसाठी बँकेचे मिशनकार्य आहे, असे सांगून बँकेचे कौतुक केले.
धर्मादाय निधी वाटपामध्ये लाभार्थी असलेल्या संस्थांच्या वतीने हिंदू सेवा संघआंभाण, डहाणू तालुका चर्मकारी संस्था, प्रभात वाचनालय चटाळे, भारत वाचनालय केळवे यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेचे उपाध्यक्ष हेमंतकुमार वझे यांनी आभार मानले.