निर्माल्य समुद्रात न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन
म. टा. वृत्तसेवा, वसई
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अर्नाळा येथील मी बंदरपाडेकर या संस्थेच्या वतीने विशेष समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविली होती. समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या संख्येने गौरी गणपतीचे विसर्जन होत असते. यासाठी भक्तांच्या कार्यात कचऱ्याचे विघ्न येऊ नये, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
मी जागृत बंदरपाडेकर या अर्नाळा येथील सामाजिक संस्थेतर्फे आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी अर्नाळा येथे विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जाते. सध्या समुद्रकिनाऱ्याचा परिसर हा लाटांच्या सोबत येणाऱ्या कचऱ्यामुळे कचरामय झाला आहे. तसेच ऐन गणेशोत्सवात विसर्जनादरम्यान नागरिकांना किनाऱ्यावरील कचऱ्याची समस्या येऊ नये, यासाठी अर्नाळा किनाऱ्याची स्वच्छता मी जागृत बंदरपाडेकर सामाजिक संस्था व ग्रामस्थ यांच्यातर्फे करण्यात आली.
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या संख्येने गौरी, गणपतींच्या मूर्ती विसर्जनासाठी आणले जातात. त्यासोबतच निर्माल्य समुद्रात टाकून दिले जात असल्याने पुन्हा ते निर्माल्य लाटांसोबत समुद्रकिनारी येत असते. तसे होऊ नये व समुद्र स्वच्छ राहावा, यासाठी संस्थेच्या वतीने समुद्राच्या परिसरातच खड्डे मारून त्या ठिकाणी निर्माल्य जमा केले जात आहे. तसेच जमा केलेल्या निर्माल्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष निनाद पाटील यांनी सांगितले.