म. टा. वृत्तसेवा, वसई
अर्नाळा येथील 'मी जागृत बंदरपाडेकर अभियान' व विरार येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून नुकतीच अर्नाळा समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवली. आजच्या तरुण-तरुणींनी समुद्रकिनारे व आपल्या गाव, शहर तसेच सर्वच परिसर कायम स्वच्छ राहतील, यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन 'मी जागृत बंदरपाडेकर'चे निनाद पाटील यांनी केले.
'मी जागृत बंदरपाडेकर' व विवा कॉलेज यांच्या वतीने अर्नाळा समुद्रकिनारी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फक्त एक दिवसाचा स्वच्छता मोहिमेचा फार्स न करता महिन्यात किमान अशा दोन समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमा राबवून अर्नाळा समुद्रकिनारा संपूर्ण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. एकदा स्वच्छता करण्यापेक्षा कायमस्वरूपी समुद्रकिनारे स्वच्छ राहिल्यास पर्यटक आकर्षित होतील, त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. आम्ही गावात सतत स्वछता मोहीम घेत असतो असे निनाद पाटील यांनी सांगितले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शन केले. स्वच्छता हीदेखील एक राष्ट्रसेवाच आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून देशाची कण कण सेवा करून स्वच्छ भारताकडून समृद्ध भारत होण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निश्चय प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले.
विवा कॉलेज व्यवस्थापनाचे संजीव पाटील, संजय पिंगुळकर, बायोलॉजिकल सायन्स डिपार्टमेंचा पूर्ण कर्मचारी वर्ग, वैभव सातवी तसेच या उपक्रमाच्या समन्वयक डॉ. दीपा वर्मा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.