म. टा. वृत्तसेवा, वसई
विजेच्या धक्क्याने मरण पावलेल्या म्हशींच्या मालकाला दोन वर्षांनंतर अखेर प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळाली आहे. २०१७ मध्ये विजेच्या तारा पडून म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
विरार पूर्वेतील मेढापाडा, पारोळ येथे राहणाऱ्या दुग्ध व्यावसायिक सुधाकर बिस्तूर गरेल यांच्या दोन म्हशी शेतात चरत असताना २६ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळच्या विजेची तार पडून जागीच मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे या व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच त्याचा परिणाम त्यांच्या रोजगारावर झाला होता. या घटनेचा पंचनामा करून या मालकाला नुकसान भरपाई मिळावी याबाबतची मागणी महावितरण विभागाकडे वसई काँग्रेसचे कुलदीप वर्तक यांनी केली होती. मात्र त्या कामात दिरंगाई झाल्यामुळे भरपाई मिळण्यास विलंब होत होता याबाबत पुन्हा वर्तक यांनी महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांच्याशी चर्चा केली असता या घटनेच्या नुकसानभरपाईला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लगेचच मृत झालेल्या म्हशींच्या मालकाला ६० हजार इतकी नुकसान भरपाई मिळाली असून याचा धनादेश गरेल कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला आहे.