ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
या कामांना परवानगी...
रस्ते, वीज, पाणी, दूरसंचार यंत्रणा, मलनि:सारण, इंटरनेट
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
नालेसफाई, मलनिःसारणापासून रस्त्यांची दुरुस्ती तसेच वीज संदर्भातील इतरही अनेक महत्त्वाची कामे पावसाळ्यापूर्वी दरवर्षी केली जातात. पावसाळा दोन महिन्यांवर आला असताना करोनासंकटामुळे यंदा ही कामे होणार की नाहीत, असाच प्रश्न निर्माण झाला होता. करोनाचा वाढत चाललेला प्रभाव व अनिश्चितता लक्षात घेऊन लॉकडाऊन असले, तरीही नित्याची वार्षिक अत्यावश्यक सर्व कामे पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पावसाळ्यापूर्वीची कामे आता मार्गी लागू शकतील.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे खासगी तसेच सरकारी कामे ठप्प झाली आहेत. सध्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागांनाही त्यांची कामे करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. सर्वसाधारणपणे एप्रिलअखेरनंतर खोदकाम किंवा दुरुस्तीची कामे नव्याने काढण्यास परवानगी दिली जात नाही. मेच्या दुसऱ्या टप्प्यात मान्सूनपूर्व पाऊस कधीही हजेरी लावत असल्याने या कामांचा फटका बसण्याची शक्यता असते. मात्र यावर्षी अशा पावसाळापूर्व दुरुस्तीच्या कामांना मार्चपासून सुरुवातच होऊ शकलेली नाही. त्यामुळे यापुढे ही कामे काढल्यास नागरिकांना पावसाळ्यात गैरसोयीचा सामना करावा लागेल. रस्तेदुरुस्तीची कामेही पावसाळ्यापूर्वी करावी लागतात, अन्यथा खड्डे भरले जात नाहीत व डांबर टिकत नाही.
खासकरून नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावी लागतात. अन्यथा नाल्यातील अडथळे व जमलेल्या कचऱ्यामुळे पहिल्याच पावसात ते तुंबण्याची भीती असते. शहरामध्ये बिकट परिस्थिती उदभवू शकते. महावितरणकडूनही वीज यंत्रणेची देखभाल गरजेची असते. जेणेकरून पावसाळ्यात वीजयंत्रणेत बिघाड होणार नाही व ग्राहकांना अखंडित वीज मिळेल. उघड्या वीजवाहक तारांवर आदळणाऱ्या झाडाझुडपांची छाटणी करावी लागते, अन्यथा वादळवाऱ्यात अपघाताचा धोका असतो. ही सर्व निकड लक्षात घेऊन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अत्यावश्यक स्वरूपाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत रस्ते, वीज, पाणी, दूरसंचार यंत्रणा, मलनि:सारण, इंटरनेट आदी कामे करण्यास परवानगी दिली आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य व प्रमुख महामार्गांची कामे, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्ते, मलनिःसारण, सांडपाणी व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्वीची इतर सर्व दुरुस्तीची कामे, ग्रामीण रस्ते, पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत रस्ते, महावितरण व महापारेषण आणि महानिर्मिती, इतर विद्युत विषय विभागाकडील विजेचे खांब टाकणे, दुरुस्ती, भारत संचार निगम लिमिटेड आणि इतर दूरसंचार कंपनीच्या दूरसंचार व इंटरनेट सेवा संचालन, वीजपुरवठा देखभाल, पाणीपुरवठा, स्वच्छतेची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सुरक्षित वावर गरजेचा
ही कामे करणाऱ्या व्यक्तींनी प्रशासनाच्या आदेशाची प्रत, तसेच कार्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अत्यावश्यक कामे करत असताना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घ्यावी. तसेच, सामाजिक सुरक्षित वावराचे भान पाळावे, असे बजावण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.