अ‍ॅपशहर

नव्या ठाण्याला गोंधळातच मंजुरी

ठाण्याच्या खाडीपलिकडे एमएमआरडीएच्या सहकार्याने नवे ठाणे शहर वसविण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी आणि भाजपने टोकाचा विरोध केला असला तरी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळाच्या वातावरणात सत्ताधारी शिवसेनेने प्रस्ताव मंजूर केला...

Maharashtra Times 20 Nov 2018, 1:21 am
भाजप, राष्ट्रवादीचा विरोध डावलला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम confirmation in new district
नव्या ठाण्याला गोंधळातच मंजुरी


म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

ठाण्याच्या खाडीपलिकडे एमएमआरडीएच्या सहकार्याने नवे ठाणे शहर वसविण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी आणि भाजपने टोकाचा विरोध केला असला तरी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळाच्या वातावरणात सत्ताधारी शिवसेनेने प्रस्ताव मंजूर केला. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि शहर नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी या विषयावरील प्रशासनाची भूमिका सभागृहात सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोपप्रत्यारोपांमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोणतीही ठोस चर्चा न होता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आली.

खाडीपलिकडच्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास करून तिथे नवे ठाणे वसविण्यासाठी ठाणे पालिकेने पुढाकार घेतला आहे. एमएमआरडीए आणि ठाणे पालिकेने संयुक्तरित्या हा विकास करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. त्याप्रस्तावाला राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे सर्वसाधारण सभेत हा विषय गाजणार याची कल्पना सर्वांनाच होती. मात्र, विषय चर्चेसाठी आल्यानंतर जयस्वाल आणि निंबाळकर यांनी त्यामागची प्रशासकीय भूमिका नमूद केली. आपण हा प्रस्ताव मंजूर केला किंवा नामंजुर केला तरी या भागाचा विकास होणारच आहे. मात्र, एकही पैसा न मोजता पालिकेला या विकासात सहभागी होण्याची संधी असून त्याचा फायदा आपण घ्यायला हवा. नव्या भागाचा सुनियोजित विकास झाला तर त्याची फळे जुन्या ठाणे शहराला चाखता येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रस्तावित नव्या शहरांतील ५५ टक्के भाग हा वनक्षेत्राचा असून ३७ टक्के भाग खासगी आहे. विद्यमान ठाणे शहरातील २०० हेक्टर जागेचाही त्यामुळे विकास होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच, २०१२मध्ये ने पोलिसन या कंपनीने केवळ वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे आराखडे तयार केले होते. नव्या ठाण्याचा त्यात उल्लेख नव्हता, अशी माहिती सभागृहात देण्यात आली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. काही तासांपुर्वी विरोधकांनी आयुक्तांच्या कामाचे कौतुक केले. आता विरोधासाठी विरोध करत असल्याचे सांगत नरेश म्हस्के यांनी हा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना मंजूर करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला. सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. मात्र, या विषयासह कोस्टल रोड, खाडीवरील उड्डाणपूल या प्रस्तावांनाही मंजुरी देत सर्वसाधारण सभा आटोपण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज