काँग्रेसच्या पाच पदाधिकाऱ्यांनी केला भाजपप्रवेश
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील काँग्रेसच्या नेत्यांनी यापूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली असताना आता काँग्रेस पक्षाचे नगरसेवकदेखील सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत. गुरुवारी काँग्रेसच्या पाच पदाधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. यामध्ये नवी मुंबई काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, निशांत भगत, अंकुश सोनवणे, विजय वाळुंज व अजय वाळुंज यांचा समावेश आहे. यामुळे नवी मुंबईत काँग्रेसला भगदाड पडले.
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित केलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, अनंत सुतार उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे प्रकल्पग्रस्त नेते म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे दशरथ भगत यांना काही वर्षांपासून त्यांना पक्षातून डावलण्यात येत होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्येच राहून प्रकल्पग्रस्त संघटनेच्या माध्यमातून आपले समाजकारण सुरू ठेवले होते. त्यातून त्यांनी नवी मुंबईत स्वत:चे वेगळे अस्तित्व तयार करून तीन नगरसेविका निवडून आणल्या.
दरम्यान, गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाने नवी मुंबईची राजकीय समीकरणे बदलली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होऊनही दोन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा निराशा आली. परिणामी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दशरथ भगत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
पाच नगरसेविकांचा भाजपप्रवेश लांबणीवर
माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्यासोबत विद्यमान काँग्रेस नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली निशांत भगत, अंजली वाळुंज व हेमांगी सोनवणे भाजप प्रवेश करणार होत्या, मात्र या पाच नगरसेविकांचा स्वतंत्र गट स्थापण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने तूर्तास काँग्रेसच्या या पाच नगरसेविकांचा भाजप प्रवेश रखडला आहे.