म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर तालुक्यातील बोईसर पूर्व मान येथील थीम अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर फसवणूक, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था व संघटनाकडून गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य सायबर सेल, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन व कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतात सर्वप्रथम सायबर फसवणूक आणि गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करू न शकणारे प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. आधुनिक तंत्रज्ञान वाढत असताना देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. लोकांमध्ये याविषयी माहिती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत आहेत. म्हणून लोकांमध्ये जागरुकता
होणे महत्त्वाचे आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी थीम महाविद्यालयाचे संचालक, डॉ. एन. के. राणा यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. जॉर्ज आरकल अध्यक्ष सीएसआय मुंबई, संचालक डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन आणि डॉ. सुरेश चंद्र गुप्ता, प्रमुख सीएसआय मुंबई, यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.
महाराष्ट्र सायबर सेलचे पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व तसेच बँकेचा युजर आयडी, एटीएम, डेबिट कार्डचा क्रमांक व पिन पासवर्ड, ओटीपी कोणत्याही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन केले. तसेच सायबर गुन्हे कसे घडतात, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, त्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याबद्दलचीही माहिती दिली. वकील विकी शाह यांनी सायबर गुन्हेगारी विषयी असलेल्या कायद्याबाबत माहिती दिली. तर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कुणाल राणे यांनी आधार क्रमांकाचा गैरवापरातून करण्यात आलेल्या फसवणुकीबाबत माहिती दिली. स्मिथ गोन्सालविस यांनी इमेल, फोन कॉल्स व मेसेजद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले. त्याबरोबरच 'सायबर स्वच्छ' अभियानाबद्दल माहिती दिली. के. आर. चौबे माजी अध्यक्ष सीएसआय मुंबई यांनी आभार प्रदर्शन केले.