म. टा. वृत्तसेवा,वसई
शिवजयंतीचे औचित्य साधून ‘सायकल ऑन सायकलिस्ट क्लब, आगाशी’ यांच्यातर्फे आगाशी ते वसई किल्ला चिमाजी आप्पा स्मारक ते पुन्हा आगाशी या ४२ किमी मार्गावर सायकल रॅलीचे आयोजन रविवारी सकाळी करण्यात आले होते. या रॅलीत ८० जण सहभागी झाले होते.
विविध ठिकाणांहून एकत्र आलेल्या सायकलप्रेमींची ही रॅली अर्नाळा सागरी पोलिस ठाणे येथून सकाळी ७ वाजता सुरू झाली. ती वसई किल्ल्यातील चिमाजी आप्पा स्मारकाला भेट देऊन पुन्हा आगाशी येथे ११ वाजता परतली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सायकलचा वापर करावा, जवळच्या अंतरावर जाण्यायेण्यासाठी सायकलच वापरा असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. इंधन बचत, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यासाठी स्वच्छ वसई - हरित वसई हा नारा देण्यात आला. पहिलेच वर्ष असूनही या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
या रॅलीची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. या सायकल रॅलीचे संयोजन ऋषभ भोईर, विनायक शिरोडकर, वरुण पुरंदरे व इतरांनी केले होते.
अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केरूभाऊ कोल्हे यांनी या सायकलपटूंचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. ही रॅली यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांनीही परिश्रम घेतले.