अ‍ॅपशहर

हॉटेल, बारना ‘अग्निकुलूप’

अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला नसल्यांना ७२ तासांची नोटीस देऊनही त्याची दखल न घेतलेल्या हॉटेल्स, लाऊंज, बार आणि हुक्का पार्लर सील करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

Maharashtra Times 5 Jan 2018, 4:00 am
ना हरकत प्रमाणपत्र नसलेली ४५८ आस्थापना रडारवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम decesion to seal hotels bars in thane
हॉटेल, बारना ‘अग्निकुलूप’


म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला नसल्यांना ७२ तासांची नोटीस देऊनही त्याची दखल न घेतलेल्या हॉटेल्स, लाऊंज, बार आणि हुक्का पार्लर सील करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. याबाबत ठाणे महापालिका हद्दीतील जवळपास ४५८ आस्थापना तातडीने सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश जयस्वाल यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. कमला मिल कंपाऊंड येथे लागलेल्या आगीनंतर पालिकेने सुरक्षिततेसाठी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.
ठाणे शहरातील ज्या ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली हॉटेले, लाऊंज बार, हुक्का पार्लरनी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला सादर केलेला नाही अथवा महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६च्या तरतुदींचे पालन केलेले नाही, अशा सर्व आस्थापनांना महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार २६ सप्टेंबर, २०१७ रोजी नोटीस देण्यात आली होती. सात दिवसांत कागदपत्रे आणि योग्य त्या परवानग्या सादर करण्याचे आदेश त्यात देण्यात आले होते. मात्र, एकाही आस्थापनेने कागदपत्रे सादर न केल्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांना पुन्हा ३० डिसेंबर रोजी ७२ तासांत आपली कागदपत्रे सादर करण्याची शेवटची नोटीस बजावण्यात आली होती.
या आदेशानंतरही ज्या आस्थापनांनी अधिनियमातील तरतुदींची पूर्तता केलेली नाही त्यांच्यावर आग प्रतिबंधक कायद्याचे पालन केले नाही असा ठपका ठेवत तसेच, वैध कागदपत्रे व अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नाही या कारणात्सव कारवाई करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत.

जोडण्या खंडित होणार
अग्निशमन विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी, संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईतंर्गत पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा खंडित करणे, महानगर गॅस कंपनीला कळवून संबंधित आस्थापनांची पी. एन. जी.ची जोडणी खंडित करण्यात येणार आहेत. या आस्थापनांमधील नाशवंत सामान बाहेर काढण्यासाठी २४ तासाची मुदत देण्यात आली आहे. ही कारवाई झाल्यानंतर ज्या आस्थापना आपली वैध कागदपत्रे, अग्निशमन विभागाची ना हरकत दाखला सादर करतील. त्यांच्याकडून ५०० रुपयांचे सत्यप्रतिज्ञापत्र घेत सील उघडले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज