म. टा. वृतसेवा, पालघर
विक्रमगड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर ग्राहकांचा अतिरिक्त भार असल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या बँकेत सुविधांचीही वनवा असून, स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा तत्काळ सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विक्रमगड या आदिवासीबहुल तालुक्याची जवळपास दीड लाख लोकसंख्या आहे. या लोकांसाठी येथे केवळ बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. यात पगारदारांसह इतर ग्राहक (खातेदार) व विविध कार्यालयांची खाती असल्याने, रेशनिंगसह इतर शासकीय कामानिमित्त चलन भरणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळेच विक्रमगड येथील महाराष्ट्र बँकेत गर्दीचा महापूर रोजच होत पाहावयास मिळतो.
ग्राहकाला एखादा व्यवहार करण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. तसेच ग्राहकांसाठी येथे आवश्यक अशी पाण्याची व बैठकीची व्यवस्थाही नाही. रोजगार हमी योजनेतील ग्राहकांची संख्याही दिवसेदिंवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे सुविधा पुरविण्याबरोबरच नवीन शाखेची निर्मिती होणेही आवश्यक आहे.
विक्रमगड तालुक्याच्या निर्मितीपासूनच या तालुक्यात स्टेट बँक नाही. यापूर्वी जव्हार येथील स्टेट बँकेतून हे व्यवहार करण्यात येत होते. मात्र, आता हेच व्यवहार विक्रमगडच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून होत आहेत. विक्रमगड तालुका निर्मितीपासून विक्रमगडसाठी स्टेट बँक शाखेची मंजुरी देण्यात आली आहे. परंतु गेल्या १९ वर्षांत येथे ही शाखा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामधंदा सोडून ग्राहकांना येथील महाराष्ट्र बँकेत धाव घेऊन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. परिणामी विक्रमगड तालुक्यासाठी मंजूर असलेली स्टेट बँकेची शाखा येथे सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याठिकाणी एकमेव बँक असल्याने येथे गर्दीचा रोजच महापूर असतो. मात्र, रांगेतील ग्राहकांसाठी इथे पिण्याच्या पाण्याची तसेच बसण्याची सोयही बँकेकडून करण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत असून, चक्कर येऊन पडण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र बँकेने तातडीने येथे सोयी-सुविधा पुरवाव्यात व ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी.
- जयप्रकाश आळशी, ग्राहक, विक्रमगड