दिव्यातील पादचारी पूल आणि नियोजित पुलांची जोडणी
अन्य स्थानकांमध्येही पुलांच्या जोडणीचा प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मध्य रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांची संख्या वाढत असताना एका रेल्वे पादचारी पुलावर चढलेल्या प्रवाशाला थेट दुसऱ्या पादचारी पुलावरही पोहचण्याच्या दृष्टीने जोड पुलांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. दिवा रेल्वे स्थानकामध्ये अस्तित्वात असलेल्या दोन पुलांची जोडणी करण्याबरोबरच नव्याने बांधण्यात येणारा तिसरा पूलही या दोन पुलांना जोडण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात डोंबिवली, ठाकुर्ली, अंबरनाथ, शेलू, भिवपुरी आणि पळसदरी स्थानकांमध्येही असे नियोजन आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ६ कोटी ५२ लाख १८ हजार ८६१ रुपयांची तरतूद आहे. यामुळे पादचारी पुलांवरील प्रवाशांना थेट इच्छित ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे.
एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेकडून प्रत्येक रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांची संख्या वाढवण्यास भर दिली असून त्यामुळे प्रवाशांना रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीतून काही दिलासा मिळाला आहे. परंतु रेल्वे स्थानकात बांधण्यात येत असलेले पूल एकमेकांना जोडलेले नसल्यामुळे एका पुलावर चढल्यानंतर दुसऱ्या ठिकाणच्या पुलावर जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची चढउतार होत असून त्याचा फटका ज्येष्ठ आणि महिलांना सहन करावा लागत आहे. ठाणे-कल्याणसारख्या स्थानकात सॅटिस आणि स्कायवॉकच्या जोडणीमुळे या प्रकारची अडचण होत नसली तरी अन्य रेल्वे स्थानकांमध्ये अशा प्रकाराच त्रास सहन करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. दिवा रेल्वे स्थानकात ठाणे दिशेला असलेला पादचारी पूल चढणाऱ्या प्रवाशांना पूर्व पश्चिमेकडे पोहोचणे सहज शक्य आहे. परंतु मधला अर्धवट पूल चढल्यास पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरून दुसरा पुलाकडे चालत जावे लागते. त्यामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन अस्तित्वातील तीनही पूल एकत्र जोडण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर याच बरोबरीने डोंबिवली, ठाकुर्ली, अंबरनाथ, शेलू, भिवपुरी आणि पळसदरी या कल्याण आणि लोणावळा विभागातील अन्य पादचारी पुलांचेही जोडणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दिवा रेल्वे स्थानकात दोन पूल अस्तित्वात असून नव्या तिसऱ्या पुलाचे बांधकाम कल्याण दिशेला सुरू आहे. या तीनही पुलांचा वापर करण्याच्या दृष्टीने पूल एकमेकांना संलग्न करण्याची गरज होती. तशी मागणीही रेल्वे प्रवाशांच्यावतीने करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये याविषयी रेल्वेकडून याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा दिलासा मिळणार असून रेल्वेचा हा सकारात्मक निर्णय आहे.
अॅड. आदेश भगत, सदस्य विभागीय रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर सर्व स्थानकातील पादचारी पुलांना गती देऊन वेगाने ही कामे वर्षभरामध्ये पूर्ण झाली. त्याच गतीने या पुलांच्या जोडणीची कामे पूर्ण करण्याची गरज आहे. रेल्वेचे अनेक प्रकल्प रखडून पडत असल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो हे प्रकार थांबण्याची गरज आहे. पादचारी पूल जोडण्याचे काम लवकर पूर्ण करावे.
नंदकुमार देशमुख, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना