म. टा. वृत्तसेवा, वसई
'अंमली पदार्थापासून स्वतःला दूर ठेवा. या चक्रव्युव्हात अडकू नका. एकदा जर या व्यसनाच्या चक्रव्यूहात अडकलात तर त्यातून सुटका होणे अत्यंत अवघड आहे,' असे प्रतिपादन कृपा फाउंडेशनचे समीर पाटील यांनी वसईतील एका कार्यक्रमात अंमली पदार्थ व्यसनाचे विविध अनुभव कथन करताना केले.
संत गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना आणि वसई पोलिस ठाणे व कृपा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वसई पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व त्यांचे पोलिस सहकारी तसेच कृपा फाऊंडेशनचे समीर पाटील, अमित पटेल, एनसीसीचे अधिकारी सुरेंद्र सिंह व कॉलेजचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. रामदास तोंडे यांनी केले.
यावेळी समीर पाटील म्हणाले की, युवकांनी वाईट व्यसनापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. सोशल मीडियाचे व्यसनही अत्यंत घातक आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासाचे व्यसन प्रत्येकाने लावून घेतले पाहिजे. योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम केले तर जीवनात यश हे निश्चितच मिळते. त्यासाठी कुठल्या व्यसनाचा आधार घेण्याची आवश्यकता मुळीच नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते याप्रसंगी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दोन व्यसने अवश्य लावून घेतली पाहिजेत ती म्हणजे वाचन आणि व्यायाम. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही व्यसने अत्यंत आवश्यक आहेत. वाईट व्यसनापासून अलिप्त राहण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अजित यादव, प्रा. डॉ. एफिजीन तुस्कानो, ग्रंथपाल चैतन्य वीर, प्रा. डॉ. अनिल सोनवणे, प्रा. डेल्टिना रूमाव आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामदास तोंडे यांनी केले तर आभार प्रा. अमित पटेल यांनी मानले.