म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बोईसर आगारातर्फे बोईसर येथे '३१वे राज्य रस्ता सुरक्षा अभियान' ११ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रा. संजय घरत यांनी मोहिमेचे उद्घाटन केले. उपस्थित वाहन, चालक, कार्यालयीन कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना परिश्रमाकडे पाठ फिरवू नका, परिश्रम व प्रामाणिकपणा हे दोन गुरू आहेत, बुद्धीला परिश्रमाची जोड द्या, परिश्रम यश व आनंद देतात, वाहन चालवताना स्वतःची काळजी घेऊन इतरांची काळजी घ्या, व्रतस्थ होऊन ग्राहकांची सेवा करा, असा मोलाचा संदेश दिला. या सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनचालकांचे प्रबोधन शिबीर, नेत्र व आरोग्य तपासणी, समुपदेशन करण्यात येणार आहे. या प्रसंगी आगर व्यवस्थापक संदीप शिंदे, यांनी ही सुरक्षितता केवळ मोहिमेपुरता न राहता वर्षभर वाहतुकीच्या नियमांचे पालन करून ते अंमलात आणायला हवेत, असे सांगितले. या कर्यक्रमास वाहतूक निरीक्षक दिनकर राठोड, कार्यशाळा अध्यक्ष दिलीप राऊत, व लिपिक दिलीप पाटील आदी उपस्थित होते. लेखापाल विनय चौधरी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.