आज स्वीकारणार पदभार
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
पुणे महापालिकेच्या परिवहन विभागात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केलेल्या, मात्र पदभार न स्वीकारलेल्या डॉ. विजय सूर्यवंशी यांची कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. आज, शुक्रवारी ते पदभार स्वीकारतील. सूर्यवंशी २०१०च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील रखडलेल्या विकासकामांचा ठपका ठेवत आयुक्त गोविंद बोडके यांची श्रेणी सरकारकडून कमी करण्यात आली होती. तर सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पुरेशी मुदत आणि निधी दिल्यानंतरही हे काम मार्गी लागले नसल्यामुळे बुधवारी प्रधान सचिवांनी घेतलेल्या बैठकीत आयुक्तांवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले. यानंतर गुरुवारी राज्य सरकारकडून गोविंद बोडके यांची उचलबांगडी करण्यात आली.
शहरातील रखडलेला कचरा प्रकल्प, मागील पाच वर्षांपासून निधीअभावी खोळंबलेली विकासकामे, सांडपाणी प्रकल्प मार्गी लावण्याचे फसलेले प्रयत्न आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला बांधकाम बंदीसारखा गंभीर इशारा, होऊ घातलेल्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सूर्यवंशी यांना तातडीने अनेक धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत. कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार पालिकेला ई-रवीन्द्रन आणि त्यानंतर पी. वेलरासू यांच्यासारखे सक्षम निर्णय घेणारे आयएएस अधिकारी लाभले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा रोष पत्करून अनेक धाडसी निर्णय घेत रखडलेली अनेक कामे मार्गी लावली, मात्र आयुक्तांना नियोजित तीन वर्षांचा कार्यकाळ या दोन्ही अधिकाऱ्यांना पूर्ण करता आला नाही.
लोकप्रतिनिधींच्या रोषाला बळी पडल्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली. पी. वेलरासू यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर मार्च २०१८मध्ये गोविंद बोडके यांची आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली, मात्र अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यात बोडके अयशस्वी ठरले. यामुळेच शहरातील कोणताही विकासप्रकल्प मागील दोन वर्षांत मार्गी लागू शकलेला नाही. हाच ठपका राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने त्यांच्यावर ठेवला. यानंतर राज्य सरकारने गुरुवारी कोल्हापूर, रायगड जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कामाची विशेष छाप पाडत राज्य सरकारकडून कौतुक मिळवलेल्या डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेची धुरा सोपवली. पुढील आठ महिन्यांत रखडलेल्या कामाचा निपटारा करत महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सूर्यवंशी यांची कसोटी लागणार आहे.