म. टा. वृत्तसेवा, कल्याण कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज हजारो टन भाजीपाला आणि कडधान्याची उलाढाल होत असून उरलेला, सडलेला भाजीपाला आणि कडधान्ये, फुले, फळे या बाजार समितीच्या आवारातच फेकली जात आहेत. अनेकदा हा कचरा जागीच पेटवून दिला जातो. यामुळे बाजार समितीच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना या धुराचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा चार ते पाच दिवस कचरा उचलला जात नसल्यामुळे आणि बाजार समितीच्या मागील रिकाम्या जागेत मेलेली जनावरेदेखील फेकली जात असल्यामुळे नागरिकांना धुराबरोबरच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे बाजार समिती प्रशासनाने या कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे. कल्याण पश्चिमेला असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाशिक, जळगाव, नगर या भागांतून भाजीपाला, फळे, फुले आणि कडधान्ये विक्रीसाठी आणली जातात. यामुळे हजारो टन धान्य, कडधान्याची बाजार समितीत उलाढाल होते. यातून मोठ्या प्रमाणात कचरा तयार होत असून हा कचरा नियमित उचलला जात नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग सडल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. अनेकदा हा कचरा उचलून नेण्याऐवजी जागेवरच जाळला जातो. त्यातच एपीएमसी मार्केटलगत मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीसह धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा धुराचे प्रमाण कितीतरी जास्त असल्यामुळे नागरिकांना श्वास गुदमरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे घरात राहणे कठीण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच बाजार समितीच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याच्या कडेला समितीच्या आवारातील मोकळ्या जागेत मेलेली जनावरे फेकली जातात. यामुळे या परिसराला अवकळा आली आहे. नागरिकांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागते. कचऱ्याच्या ढिगाला लागलेली आग दोन-दोन दिवस धगधगत असल्यामुळे धुराचे लोट वाहत असतात. या मुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून एपीएमसी बाजार प्रशासनाने कचराप्रश्न निकाली काढताना तो जाळण्यापेक्षा पालिकेच्या कचरा प्रकल्पापर्यंत नियमित वाहून नेत त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, अशी मागणी त्रस्त राहिवाशांकडून केली जात आहे. याबाबत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शामकांत चौधरी यांना विचारले असता, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कचरा नियमित आधारवाडी डम्पिंगवर वाहून नेला जात असून समितीच्या आवारात कोणत्याही प्रकारे कचरा जाळला जात नाही. व्यापाऱ्यांकडून कचरा जाळला जात असेल, तर त्याची पाहणी करून त्यांना समज देत कचरा जाळला जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे सांगितले.
बाजार समितीचे आवार बनले डम्पिंग ग्राऊंड
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2019, 4:00 am