म. टा वृत्तसेवा, वसई
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सामाजिक आणि विविध संस्थांमार्फत करण्यात आले. यावेळी ३४ अनाथ मुलांना त्याचा लाभ मिळला.
ॲड. तेजश्री राणे, दीपस्विनी कोरगावकर, प्रणव जोशी, अपर्णा आफळे, सायबा समूह, रुग्णमित्र संस्था, आमची वसई सामाजिक संस्था, धर्मसभा, ब्राह्मण उत्कर्ष मंडळ यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये संगणक, दप्तर, पादत्राणे, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, फळा, ॲटलास बूक, शब्दकोष इत्यादी शैक्षणिक साहित्यांचा समावेश होता. 'ज्ञानदीप तेवत ठेवून सगळ्यांनी विविध क्षेत्रात शिखरे गाठावी व गोब्राह्मण प्रतिपालक - शेतकऱ्यांचे तारणहार व रयतेचे पोषक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श स्वत:पुढे ठेवत समाज, राजनिती, न्याय व वाणिज्य क्षेत्रात कार्यरत राहावे,' असा उपदेश यावेळी आमची वसईच्या हृषीकेश वैद्य यांनी सर्व उपस्थितांना केला. यावेळी उपस्थीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.