म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
जव्हार-खोपोली या राज्य महामार्गाचाच एक भाग असलेल्या साईबाबा मंदिर शेजारील रस्त्यावर वसलेल्या झोपड्यांवर वर्षभरापूर्वी कारवाई करून हा भाग मोकळा करण्यात आला. परंतु आता या मोकळ्या झालेल्या भागात बांधकाम व्यावसायिकाने पत्रे लावून अतिक्रमण केले आहे.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेल्या कल्याण-बदलापूर रस्त्यावरील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक वर्षांपासून काही झोपड्या वसल्या होत्या. राज्य महामार्गाच्या रूंदीकरणावेळी या ५०हून अधिक झोपड्यांवर कारवाई करत हा रस्ता मोकळा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे पुन्हा झोपड्या उभारल्या जाऊ नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा पत्रेही लावले होते. मात्र या ठिकाणाहून हुसकावलेल्या नागरिकांनी अंबरनाथ येथील विम्को नाका या भागातील एका भूखंडावर अतिक्रमण केले. शनिवारी या भूखंडावरील झोपड्यांवरही उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. त्यामुळे हे नागरिक या भागात पुन्हा येऊ नयेत, याकरिता याच रस्त्याला लागून उभ्या राहत असलेल्या एक भव्य व्यावसायिक इमारतीचे काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने थेट राज्य महामार्गाचा भागच आपल्या हद्दीत घेतला. त्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले पत्र काढत रस्त्यावरच पत्रे उभे केले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता ढिलपे यांना विचारले असता, बांधकाम व्यावसायिकाला हे पत्रे हटवण्यास सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले.