अ‍ॅपशहर

दूधविक्रेत्यांना दणका

एमआरपी’पेक्षा जास्त किंमत घेणे गुन्हा असतानाही सर्रास याचे उल्लंघन होताना दिसत आहे. वैधमापन शास्त्र विभागाने नुकतीच ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत जास्त दराने दुधाची विक्री केल्याप्रकरणी ३८ जणांवर कारवाई केली आहे. यातील सर्वाधिक कारवाई ठाणे जिल्ह्यात झाली आहे.

Maharashtra Times 23 May 2017, 3:00 am
जास्त दराने दूध व्रिकी केल्याप्रकरणी ३८ जणांवर कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fda took action on milk seller in thane and palghar
दूधविक्रेत्यांना दणका


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

‘एमआरपी’पेक्षा जास्त किंमत घेणे गुन्हा असतानाही सर्रास याचे उल्लंघन होताना दिसत आहे. वैधमापन शास्त्र विभागाने नुकतीच ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत जास्त दराने दुधाची विक्री केल्याप्रकरणी ३८ जणांवर कारवाई केली आहे. यातील सर्वाधिक कारवाई ठाणे जिल्ह्यात झाली आहे.

सहाय्यक नियंत्रक वैध मापन शास्त्र ठाणे अंतर्गत ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्हाही येतो. वैध मापन शास्त्र, ठाणे विभागाने एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एक वर्षात ठाण्यासह पालघर जिल्ह्यात १ हजार ६७७ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एकूण ४७ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये वजनकाट्याचे सर्टिफिकेट दुकानात दर्शनी भागात न लावणे आदी वेगवेगळ्या कारवायांचा समावेश असल्याची माहिती वैध मापन शास्त्र विभागाकडून देण्यात आली. यामध्ये माल कमी देणाऱ्या १७ जणांवर आणि जास्त किमतीत मालाची विक्री करणाऱ्या १७४ जणांवर कारवाया केल्या आहेत. तर, चालू वर्षाच्या एप्रिलमध्ये ७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

वैध मापन शास्त्र विभागाने जास्त किंमतीत दूध विक्री करणाऱ्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारला होता. तीन दिवसांत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ३८ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पालघरमध्ये पाच तर ठाणे जिल्ह्यात ३३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांकडून एक ते दोन रुपये अधिक रक्कम आकारली जात होती, म्हणून ह्या कारवाया केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी

दिवसेंदिवस शहरे वाढत असताना वैधमापन शास्त्र विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या ‘जैसे थे’ आहे. परिणामी, कारवाईला मर्यादा येऊन ‘मापात माप’ तसेच अधिक किंमत आकारणाऱ्यांना मोकळे रान मिळत असल्याचे दिसते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या विभागाचे कार्यालय असून येथूनच दोन्ही जिल्ह्यांचा कारभार हाकला जातो. एकूण ४४ मंजूर पदापैकी केवळ एकच शिपाईपद रिक्त आहे. सहाय्यक नियंत्रक १ पद, निरीक्षक १५, क्षेत्र सहाय्यक १२, लिपिक १, शिपाई १४ आहेत. मात्र गेल्या १५ वर्षांपासून कर्मचाऱ्यांची संख्येत तितक्या प्रमाणात वाढली नसल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी कमी आणि काम अधिक असल्याचे अधिकारी सांगतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज