अ‍ॅपशहर

‘फेलिक्सची कविता समूहाची’

वसईतील सांस्कृतिक वैशिष्ट्ये ठळकपणाने नोंदवणारी कवी फेलिक्स डिसोझा यांच्या ‘नोंदीनांदी’ कवितासंग्रहातील कविता आपली सांस्कृतिक पाळेमुळे आणि त्यातून आपली स्वतःची, समाजाची आणि जगाची ओळख शोधण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही कविता व्यक्तिनिष्ठ राहत नाही तर ती समूहाची कविता होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. वसंत पाटणकर यांनी केले.

Maharashtra Times 30 May 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम felix dsouza poem bokk nondinandi published
‘फेलिक्सची कविता समूहाची’


वसईतील सांस्कृतिक वैशिष्ट्ये ठळकपणाने नोंदवणारी कवी फेलिक्स डिसोझा यांच्या ‘नोंदीनांदी’ कवितासंग्रहातील कविता आपली सांस्कृतिक पाळेमुळे आणि त्यातून आपली स्वतःची, समाजाची आणि जगाची ओळख शोधण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही कविता व्यक्तिनिष्ठ राहत नाही तर ती समूहाची कविता होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. वसंत पाटणकर यांनी केले.

चेतना पुस्तकालय निर्मळ, स्वाभिमानी वसईकर संघटना, युवक वाचनालय, भुईगाव या संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘निर्मळ’च्या चेतना पुस्तकालय येथे रविवारी झालेल्या वसई युवा कविसंमेलनात डिसोजा यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.

‘विषय आणि आशय आपल्या प्रासादिक शैलीत कवितेच्या रूपात मांडताना डिसोजा यांची कविता ग्रामसंस्कृतीतील आपल्या संचिताचा शोध घेते. या शोधातून येत असलेली मूल्यऱ्हासाची भयावहता सूचित करते. मानव्याच्या शोधामुळे ही कविता कोणत्याही एका मर्यादित वर्तुळात राहत नाही, आठवणींचा बंध असलेल्या या कवितेतील आठवणी स्वाभाविक आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वर्तमानाशी, वास्तवाशी संबंध आहे. त्यामुळेच ती आजची कविता आहे,’ असे डॉ. रणधीर शिंदे म्हणाले.

लगतच्या भूतकाळाच्या आणि उजाड अशा वर्तमानाच्या दाबाने डिसोजा यांच्या कवितेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मानवी जीवन सुंदर आणि जिवंत करणाऱ्या संस्कृती परंपरेतील जीवनदायी प्रेरणा हे या कवितेचे मुख्य केंद्र आहे. वसई परिसरातील लोकजीवन आणि शैली आणि लोकभाषेचा सर्जनशील आविष्कार डिसोझा यांच्या कवितेतून झाला आहे, असेही ते म्हणाले. तर, कवी अजय कांडर, कृष्णा किंबहुने यांनीही विचार मांडले. डिसोझा यांच्या कवितांचे या वेळी वाचन करण्यात आले. प्रास्ताविक सचिन मेंडिस यांनी केले. एडवर्ड डिसोझा यांनी सूत्रसंचालन केले. ख्रिस्तोफर रिबेलो यांनी आभार मानले.


युवा कवी संमेलन

दुसऱ्या सत्रात युवा कवी संमेलन पार पडले. कवी स्वप्नील शेळके, नामदेव कोळी, प्रणव सखदेव, अनिल साबळे, महेष लोंढे तसेच वसईतील युवा कवी आयवन क्रास्टो, ब्रायन मेंडिस, अमृता बेंदरकर या युवा कवींचा त्यात समावेश होता. युवा लेखक कवी सॅबी परेरा यांनी सूत्रसंचालन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज