अ‍ॅपशहर

स्वप्नाची होरपळ!, २५ वर्षीय अभियंता निखिलचा तुर्भ्यातील आगीत मृत्यू

तुर्भे येथील आगीत एका कुटुंबाचं स्वप्नही होरपळलं. या घटनेत एका तरुण अभियंच्याचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. निखिल पाशिलकर या तरुण अभियंत्याने जीव गमावला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 8 May 2022, 6:52 am
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : कमी पगार मिळत असल्याने निखिल पाशिलकर याने तुर्भे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कंपनीतील काम सोडले होते. मात्र त्याच्यासारख्या निष्णात अभियंत्याची कमतरता जाणवू लागल्याने मालकाने त्याला वाढीव पगार देत पुन्हा कामावर बोलावून घेतले होते. अनेक स्वप्ने उराशी बाळगून त्याने पुन्हा कंपनीत काम सुरू केले. दुपटीने पगार मिळाल्याने निखिल समाधानी होता. मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षीच नियतीने त्याचा बळी घेतला. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा काळाने हिरावून नेला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire in navi mumbai pawane midc engineer killed
स्वप्नाची होरपळ!, २५ वर्षीय निखिलचा तुर्भ्यातील आगीत मृत्यू


ठाणे आरटीओमध्ये लिपिक पदावर असलेल्या संजय पाशिलकर यांचा निखिल हा मुलगा होता. त्याने आयटीआयमधून रबर टेक्निशियनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुर्भे येथील मे. वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा. लिमिटेड या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र शिक्षणाच्या मानाने अतिशय कमी पगार मिळत असल्याने निखिलने मागील वर्षी काम सोडले होते. यानंतर काही काळ इतरत्र काम केल्यानंतर कंपनी मालकाने पुन्हा त्याला ७ महिन्यांपूर्वी पुन्हा कामावर बोलावले होते. निखिल हा कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. शुक्रवारी दुपारी निखिल कंपनीच्या मॅनेजरबरोबर वरच्या मजल्यावर काम करत असताना अचानक कंपनीत आग लागली आणि काही क्षणात तिने रौद्र रूप धारण केले. बाहेर आगीच्या ज्वाळा धगधगत असताना आत असलेल्या निखिल आणि त्याच्या मॅनेजरने बाहेरच्या लोकांशी संपर्क साधत आपल्याला वाचविण्याची विनंती केली. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू शकली नाही. या आगीत होरपळून निखिल आणि त्याच्या मॅनेजरचा मृत्यू झाला. त्याची सगळी स्वप्ने आगीत जळून खाक झाली. कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच निखिलच्या पालकांनी आणि मित्रांनी घटनास्थळ गाठले. त्याचा फोन बंद येत असल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र निखिल त्या आधीच भक्ष्यस्थानी पडला होता. शनिवारी दुपारी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निखिलचा मृतदेह कुटुंबीयाच्या हवाली केला. एकुलत्या एका मुलाच्या जाण्याचे दु:ख पचवणे आई-वडिलांना अशक्य झाले आहे. सतत गराड्यात असणाऱ्या मितभाषी निखिलच्या जाण्याने त्याचा मित्रपरिवारही हळहळला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज