महापालिकांच्या सक्तीमुळे पहिल्यांदाच यंत्रणा
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था गरजेची असली, तरी त्याकडे होणारे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नसल्याचा सज्ज इशारा महापालिकांकडून दिल्यामुळे यंदा पहिल्यांदाचा गणेशोत्सव मंडपांमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा उभारण्यात आल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांना अग्निसुरक्षा यंत्रणा उभारणे सक्तीचे करण्यात आले होते. गणेशोत्सव मंडपांमध्ये ही सुरक्षा आवश्यक असल्याचा नियम असला तरी त्याचा फारसे पालन होत नव्हते. अखेर यंदा मंडपांची परवानगी देतानाच अग्निसुरक्षा व्यवस्था तपासण्याचा निर्णय घेतल्याने सर्व मंडळांकडून अग्निसुरक्षा यंत्रणा मंडपांमध्ये लावून भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एक हजारांच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून महापालिका, अग्निशमन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या परवानगीने ही मंडळी गणेशोत्सव साजरा करत असतात. त्यामुळे या यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमध्ये मंडपांची स्थिती, वाहतुकीचा अडथळा, दुर्घटना घडण्याचा धोका लक्षात घेऊन परवानगी दिली जात होती. अग्निशमन यंत्रणा उभारण्याची सूचना मंडळांना दिली जात असली, तरी अनेक मंडळांकडून त्याचे पालन केले जात नव्हते, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये अग्निसुरक्षेविषयी व्यापक जागरुकता निर्माण झाली आहे. शहरातील आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडपांमध्ये अशी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मोठी मंडळे अग्निसुरक्षेच्या बाबतीत सावध असून सुरक्षेची यंत्रणा उभारत असली तरी छोटी मंडळे त्यापासून दूर होती. यंदा अग्निशमन यंत्रणेकडून परवानगी देताना सगळ्या गोष्टींची तपासणी केल्यामुळे गणेशोत्सव मंडळात पहिल्यांचा अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.