म. टा. प्रतिनिधी, ठाणे
पुढे अपघात झाला आहे, चोरांनी मंगळसूत्र खेचले आहे किंवा दवाखान्याचा पत्ता विचारत बोलण्यात गुंतवून वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोलबच्चन टोळीच्या म्होरक्याला अटक केल्यानंतर फसवणुकीला आळा बसेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र अद्यापही हे प्रकार सुरूच असून वर्तकनगरमध्ये दोन भामट्यांनी अशाच पद्धतीने महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक ५४ वर्षीय महिला ठाणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत असून मंगळवारी सकाळी वर्तकनगर नाका येथे त्या भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. येथे रस्ता ओलांडत असताना दोन व्यक्ती त्यांना भेटल्या. या भामट्यांनी महिलेला या ठिकाणी उभे राहून देवाला एक रुपयाची अगरबत्ती चढवा आणि पाच पिंपळाची पाने गंगेत वाहा, असे सांगून महिलेला पुढे काही अंतर घेऊन गेले. नंतर भामट्यांनी महिलेला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवले. एका भामट्याने तुम्ही देवाला मानता की नाही, अशी महिलेला विचारणा करून अंगावरील दागिने काढून पर्स ठेवण्याविषयी सांगितले. ही पर्स दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देण्यास भामट्यांनी महिलेला भाग पाडले. पर्स मिळताच दोघे भामटे पळून गेले. अशाप्रकारे भामट्यांनी महिलेचे १ लाख ३५ हजारांचे दागिने फसवणूक करून लांबवले आहेत. आरोपी ३५ ते ४० वर्षे वयोगटातील असून या प्रकारानंतर शहरात अद्याप बोलबच्चन टोळी सक्रिय असल्याचे दिसून येते.