फुटबॉल वर्ल्डकप फिवर; प्रो कबड्डीच्या धर्तीवर आयोजनाचे प्रयत्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर गोविंदाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाण्यात दहीहंडी आयोजकांची लगबग सुरू झाली आहे. दहीहंडी उत्सवात मानवी थरांचे विक्रमी मनोरे रचल्यानंतर आता थरांच्या जिवघेण्या स्पर्धेत न पडता या उत्सवाला नवे ग्लॅमर देण्याचा प्रयत्न होणार आहे. मातोश्रीवरील युवराजांच्या फुटबॉल प्रेमाखातर दहीहंडीतून फुटबॉलच्या प्रचाराची रणनीती आखली जात आहे. ठाण्यातील टेंभीनाक्यासह शिवसेनापुरस्कृत उत्सवात फुटबॉल वर्ल्डकपचा फिवर पाहायला मिळणार आहे. तर, वर्तकनगर येथील संकृती युवा प्रतिष्ठानच्या उत्सवात प्रो कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
मराठमोळ्या मातीतला दहीहंडी उत्सव ठाण्याने जगभरात पोहचवला. नऊ मानवी थरांच्या मनोऱ्याचे विक्रम याच शरहात प्रस्थापित झाले. स्पेनचे कॅसलर्सचे मानवी थरांचे कौशल्यही ठाण्यात पाहायला मिळाले. गोविंदा पथकांवर विक्रमी बक्षिसांची उधळणही याच शहराने केली. मात्र, न्यायालयाच्या निर्बंधांमुळे गेल्या दोन तीन वर्षांत उत्सवाच्या पंढरीत शुकशुकाट पसरला होता. मात्र, आता न्यायालयाने निर्बंध शिथिल केल्यामुळे पुन्हा नव्या जोमाने उत्सव साजरा करण्यासाठी आयोजक सज्ज झाले आहेत. उत्सवाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणाऱ्या आ. जीतेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या संस्थेने दोन वर्षांपूर्वी उत्सवाचे आयोजन बंद केले होते. यंदाही पाचपाखाडीच्या नाक्यावर गोविंदाचा जल्लोष पहायला मिळणार नाही. मात्र, शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांकडून मात्र उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.
मानवी थरांच्या विक्रमाची बरोबरी झाल्यानंतर मुंबईतील दोन ते तीन पथके दहा थरांचा विक्रम प्रस्थापीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, अशा विक्रमासाठी विक्रमी बक्षिस देण्याची मानसिकता तूर्त ठाण्यातील आयोजकांमध्ये दिसत नाही. थरांचा जिवघेण्या स्पर्धेत न पडता उत्सवासह आयोजकांना वेगळ्या ग्लॅमरची ओढ लागल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे फुटबॉलवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यातच यंदा फिफा अंडर १७चा वर्ल्डकप भारतात होत आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवातून फुटबॉल फिवर तयार करण्याचे आदेश मातोश्रीवरून जारी झाल्याचे समजते. त्यामुळेच टेंभी नाका येथे तशा आयोजनासाठी कथ्याकूट सुरू आहे.
फुटबॉल स्टेडियमसदृश वातावरण उत्सवाच्या ठिकाणी उभे करण्याचे प्रयत्न होणार असल्याचे समजते. तर, वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा लिग सुरू केली जाणार असल्याचे वृत्त आहे. यंदा तशा आयोजनासाठी वेळ कमी असला तरी आयोजकांची धडपड सुरू आहे. यू मुंबा किंवा प्रो कबड्डीतील एखादी टीम या उत्सवात हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच, पुढल्या वर्षीपासून एक ते दोन दिवस आधीपासून प्रो गोविंदा लिग भरवण्याचा विचारही सुरू असल्याचे समजते. शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक यांच्यावतीने दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार असल्याचे समजते.
बक्षिसांची घागर उताणी
२००८ ते २०१३ या कालावधीत दहीहंडी उत्सव सर्वोच्च उंचीवर पोहोचला होता. ठाण्यातील दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या राजकीय नेत्यांमधील स्पर्धा त्याला कारणीभूत ठरली. एका दिवशी तब्बल एक-एक कोटी रुपयांच्या बक्षिसांची उधळण ठाण्याने पाहिलेली आहे. साडेआठ थरांच्या मनोऱ्याला १५ लाखांचे रोख बक्षीस नोटांच्या बंडलांसह दिलेलेही गोविंदाप्रेमींनी पाहिले आहे. उत्सवातून मिळणारा पैसा गोविंदा पथकांना खुणावू लागल्यानंतर सरावालाही शिस्त लागली आणि मंडळांची संख्याही झपाट्याने वाढली. मात्र, न्यायालयाने घातलेल्या निर्बंधानंतर उत्सवाचा हा ज्वर ओसरला आहे. आयोजकांमधील राजकीय स्पर्धाही आता उत्सवात उरलेली नाही. त्याशिवाय नोटबंदीनंतर आलेली मंदी आणि आर्थिक व्यवहारांवरील मर्यादेमुळे बक्षिसांची मोठी उलाढालही शक्य होणारी नाही. त्यामुळे यंदा दहीहंडीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसली तरी बक्षिसाची घागर मात्र उताणीच पडण्याची शक्यता जास्त आहे. आयोजकांकडून लाखमोलाची बक्षिसे दिली गेली तरी ती रक्कम पूर्वीची उंची गाठण्याची शक्यता धूसरच आहे.
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर गोविंदाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाण्यात दहीहंडी आयोजकांची लगबग सुरू झाली आहे. दहीहंडी उत्सवात मानवी थरांचे विक्रमी मनोरे रचल्यानंतर आता थरांच्या जिवघेण्या स्पर्धेत न पडता या उत्सवाला नवे ग्लॅमर देण्याचा प्रयत्न होणार आहे. मातोश्रीवरील युवराजांच्या फुटबॉल प्रेमाखातर दहीहंडीतून फुटबॉलच्या प्रचाराची रणनीती आखली जात आहे. ठाण्यातील टेंभीनाक्यासह शिवसेनापुरस्कृत उत्सवात फुटबॉल वर्ल्डकपचा फिवर पाहायला मिळणार आहे. तर, वर्तकनगर येथील संकृती युवा प्रतिष्ठानच्या उत्सवात प्रो कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
मराठमोळ्या मातीतला दहीहंडी उत्सव ठाण्याने जगभरात पोहचवला. नऊ मानवी थरांच्या मनोऱ्याचे विक्रम याच शरहात प्रस्थापित झाले. स्पेनचे कॅसलर्सचे मानवी थरांचे कौशल्यही ठाण्यात पाहायला मिळाले. गोविंदा पथकांवर विक्रमी बक्षिसांची उधळणही याच शहराने केली. मात्र, न्यायालयाच्या निर्बंधांमुळे गेल्या दोन तीन वर्षांत उत्सवाच्या पंढरीत शुकशुकाट पसरला होता. मात्र, आता न्यायालयाने निर्बंध शिथिल केल्यामुळे पुन्हा नव्या जोमाने उत्सव साजरा करण्यासाठी आयोजक सज्ज झाले आहेत. उत्सवाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणाऱ्या आ. जीतेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या संस्थेने दोन वर्षांपूर्वी उत्सवाचे आयोजन बंद केले होते. यंदाही पाचपाखाडीच्या नाक्यावर गोविंदाचा जल्लोष पहायला मिळणार नाही. मात्र, शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांकडून मात्र उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.
मानवी थरांच्या विक्रमाची बरोबरी झाल्यानंतर मुंबईतील दोन ते तीन पथके दहा थरांचा विक्रम प्रस्थापीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, अशा विक्रमासाठी विक्रमी बक्षिस देण्याची मानसिकता तूर्त ठाण्यातील आयोजकांमध्ये दिसत नाही. थरांचा जिवघेण्या स्पर्धेत न पडता उत्सवासह आयोजकांना वेगळ्या ग्लॅमरची ओढ लागल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे फुटबॉलवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यातच यंदा फिफा अंडर १७चा वर्ल्डकप भारतात होत आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवातून फुटबॉल फिवर तयार करण्याचे आदेश मातोश्रीवरून जारी झाल्याचे समजते. त्यामुळेच टेंभी नाका येथे तशा आयोजनासाठी कथ्याकूट सुरू आहे.
फुटबॉल स्टेडियमसदृश वातावरण उत्सवाच्या ठिकाणी उभे करण्याचे प्रयत्न होणार असल्याचे समजते. तर, वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा लिग सुरू केली जाणार असल्याचे वृत्त आहे. यंदा तशा आयोजनासाठी वेळ कमी असला तरी आयोजकांची धडपड सुरू आहे. यू मुंबा किंवा प्रो कबड्डीतील एखादी टीम या उत्सवात हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच, पुढल्या वर्षीपासून एक ते दोन दिवस आधीपासून प्रो गोविंदा लिग भरवण्याचा विचारही सुरू असल्याचे समजते. शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक यांच्यावतीने दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार असल्याचे समजते.
बक्षिसांची घागर उताणी
२००८ ते २०१३ या कालावधीत दहीहंडी उत्सव सर्वोच्च उंचीवर पोहोचला होता. ठाण्यातील दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या राजकीय नेत्यांमधील स्पर्धा त्याला कारणीभूत ठरली. एका दिवशी तब्बल एक-एक कोटी रुपयांच्या बक्षिसांची उधळण ठाण्याने पाहिलेली आहे. साडेआठ थरांच्या मनोऱ्याला १५ लाखांचे रोख बक्षीस नोटांच्या बंडलांसह दिलेलेही गोविंदाप्रेमींनी पाहिले आहे. उत्सवातून मिळणारा पैसा गोविंदा पथकांना खुणावू लागल्यानंतर सरावालाही शिस्त लागली आणि मंडळांची संख्याही झपाट्याने वाढली. मात्र, न्यायालयाने घातलेल्या निर्बंधानंतर उत्सवाचा हा ज्वर ओसरला आहे. आयोजकांमधील राजकीय स्पर्धाही आता उत्सवात उरलेली नाही. त्याशिवाय नोटबंदीनंतर आलेली मंदी आणि आर्थिक व्यवहारांवरील मर्यादेमुळे बक्षिसांची मोठी उलाढालही शक्य होणारी नाही. त्यामुळे यंदा दहीहंडीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसली तरी बक्षिसाची घागर मात्र उताणीच पडण्याची शक्यता जास्त आहे. आयोजकांकडून लाखमोलाची बक्षिसे दिली गेली तरी ती रक्कम पूर्वीची उंची गाठण्याची शक्यता धूसरच आहे.