अपघातानंतर प्रशासनाची धावपळ
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील सरकत्या जिन्याच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील सगळ्या सरकत्या जिन्यांचे सुरक्षा ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उपनगरीय रेल्वे स्थानकातील ६१ सरकत्या जिन्यांचा समावेश आहे. तर भविष्यामध्येही स्थानकात लावल्या जाणाऱ्या सगळ्या सरकत्या जिन्यांची सुरक्षा तपासली जाणार आहे. परंतु रेल्वेसाठी ही दैनंदिन प्रक्रिया असून सुरक्षेच्या बाबतीत रेल्वे प्रशासन सतर्क असून दर आठवड्याला सरकत्या जिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. सरकत्या जिन्यांच्या दुरुस्तीचे काम संबंधित कंपन्यांना दिले असून त्यानंतर ही कामे नियमित सुरू राहतात, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे पुलांवर चढण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकांमध्ये सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी ठाणे स्थानकामध्ये या सुविधेची सुरुवात झाल्यानंतर आत्तापर्यंत ६१ स्थानकांमध्ये सरकते जिने बसवण्यात आले. तर पुढील वर्षभरामध्ये २८८ हून अधिक सरकते जिने बसवण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. अनेक स्थानकांमध्ये या संदर्भातील कामे सुरू असून त्यासाठी आवश्यक खड्डे खोदण्यापासून स्थानकांमध्ये जिनेही पोहोचले आहेत. या जोडण्या पूर्ण झाल्यानंतर या सेवा सुरू होतील. नवे एस्कलेटर बसवल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एक वर्षासाठी संबंधित कंपनीकडे असते. तर त्यानंतर त्याच कंपनीला रेल्वेकडून देखभालीचे कंत्राट दिले जाते. परंतु या जिन्यांच्या सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारचे ऑडिट आत्तापर्यंत झाले नव्हते. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये एप्रिल महिन्यामध्ये घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून विस्तृत चौकशी करण्यात आली आहे. या सरकत्या जिन्याचे नादुरुस्त भाग प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या गुणवत्ता आणि इतर बाबींवर पूर्ण तपासणी केली जाणार आहे.
एस्कलेटर तपासण्याची कामे नियमितपणे सुरू असून आवश्यकतेनुसार त्याची दुरुस्ती केली जाते. सरकत्या जिन्यांबाबत रेल्वे नेहमी जागरूक असून वेळेवर आवश्यक उपाययोजना केल्या जातात. नव्याने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काम केले जात नाही.
ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे