म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांची शिट्टी हे चिन्ह गुरुवारी निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर सोमवारी पुनर्विचार करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केलेली याचिका मंगळवारी फेटाळण्यात आली. यामुळे बाविआला मोठा धक्का बसला असून या निर्णयाविरोधात न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे बविआकडून सांगण्यात आले. तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही हे चिन्ह त्यांना वापरता येणार नाही.
बहुजन महापार्टीचे उमेदवार राजू लडे आणि चेतन पाटील या दोन उमेदवारांना बहुजन महापार्टीने ए बी फॉर्म दिले होते. ३ एप्रिल रोजी राजू लडे यांनी एबी फॉर्म जोडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होत. मात्र त्यानंतर चेतन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन महापार्टीचा एबी फॉर्म भरत लडे हे बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार नाहीत, असे नमूद केले. त्यामुळे गुरुवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान राजू लडे हे अपक्ष व चेतन पाटील यांना बहुजन महापर्टीचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले होते.
छाननी दरम्यान बहुजन महापार्टीच्या दोन उमेदवारांपैकी चेतन पाटील यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरल्याने राजू लडे हा दुसरा उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात राहिला. बविआने या संधीचा लाभ उठविण्यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चेतन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास शिट्टी या चिन्हावर आपला दावा करण्याबाबत चाल खेळली. याचा सुगावा लागल्यानंतर बहुजन महापार्टीकडून चेतन पाटील यांनी पक्षाने दिलेल्या एबी फॉर्म मध्ये खाडाखोड केल्याची तक्रार महापार्टीकडून करण्यात आली.
पालघर लोकसभा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांच्याकडे याचिका दाखल केली असता ती सायंकाळी फेटाळून लावण्यात आली. याचिका फेटाळण्याचे कारण देताना निवडणूक नियमावली व निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर पुनर्विचार याचिकेवर निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला नाही. आवश्यकता वाटल्यास याचिका कर्ते निवडणूक आयोगाकडे दाद मागू शकतात, असे याबाबत दिलेल्या लेखी निर्णयात म्हटले आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप ही माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या समोर झालेल्या युक्तिवादादरम्यान मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ.रवींद्र फाटक, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ ह्यांची उपस्थिती आचार संहितेचा भंग करणारी असून निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली काम करीत आहेत.
मनीषा निमकर माजी राज्यमंत्री.
संबंधित याचिकेच्या निर्णयाची कागदपत्रे पाहण्याचे स्वातंत्र्य कोणालाही आहे. मंत्री कुठल्याही कामानिमित्त भेट देण्यासंधर्भात माझ्या दालनात येऊ शकतात.
डॉ. प्रशांत नारनवरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी