डिसेंबरपर्यंत २९ हजार घरांना मिळणार वीज
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. यंदाची दिवाळी अनेक घरांमध्ये नवा प्रकाश घेऊन येणार आहे. ठाण्यातील वाड्यावस्त्यांमधील २९ हजार घरांना दोन महिन्यांत वीज मिळणार असून सौभाग्य योजनेमुळे लोकांच्या जीवनातला अंधकार दूर होणार आहे. ठाण्यातील कल्याण परिमंडळातून आतापर्यंत १६ हजार ८१८ घरांमध्ये वीज जोडण्यात आली आहे. तर राज्यात ७ लाख ८८ हजार ९९२ घरे उजळली आहेत.
विजेपासून वंचित असलेल्या कुटुंबांना वीजजोडणी देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी सौभाग्य योजना प्रभावी ठरत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सौभाग्य योजनेच्या सर्वेक्षणामध्ये राज्यातील ११ लाख ६४ हजार १३५ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट असून त्यापेकी ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने तर २१ हजार ५६ लाभार्थ्यांना अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच दारिद्रयरेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दीनदयाळ ग्रामज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीजजोडणी करण्याचे काम सुरू आहे. तर ठाण्यातील कल्याण परिमंडळाचे डिसेंबर अखेर ४६ हजार ३७१ घरांमध्ये वीज जोडण्यांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १६ हजार ८१८ घरांपर्यंत वीज पोहोचली असून दोन महिन्यांत पायाभूत सुविधा मिळाल्यानंतर २९ हजार ४५३ घरांमध्ये वीजजोडणी केली जाणार आहे.
मोठ-मोठ्या शहरांमध्ये भारनियमनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर शहरालगत असलेल्या डोंगर, दरीतील अनेक पाड्यांमध्ये अजून वीज पोहचलेली नाही, हे वास्तव आहे. गेली अनेक वर्षे या वाड्यावस्त्या अंधारात जीवन जगत आहेत. त्यांच्या आयुष्यातील हा अंधार दूर करण्यासाठी सौभाग्य योजना आधार ठरत आहे.
विभाग अपेक्षित लाभार्थी वीज जोडणी केलेली घरे दोन महिन्यांत वीजजोडणी
कल्याण १ - - -
कल्याण २ २८२६ ५२६ २२००
वसई १४४६८ ४१४७ १०३२१
पालघर २९०७७ १२१४५ १६९३२
………………………………………एकूण ४६३७१ १६८१८ २९४५३
ठाण्यातील वाड्यावस्त्यांमध्ये वीज पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. २९ हजार घरांमध्ये ऑक्टोबर अखेर वीज पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे सरकारने डिसेंबरअखेर या घरांना वीज पुरविण्याचे आदेश दिले असले तरी लवकरच हे काम पूर्ण होईल.
रफिक शेख, मुख्य अभियंता, कल्याण परिमंडळ, कल्याण