म. टा. वृत्तसेवा, वसई
वसई, विरार शहर महानगरपालिकेतर्फे बेघर आणि निराधार नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण महापालिका एका संस्थेमार्फत करत असून या बेघरांना महापालिका दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत निवारा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
वसई, विरार, नालासोपारा व नायगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर, बसस्थानक, उड्डाणपूल, चौक, फूटपाथ, मोकळ्या जागेत छताविना नागरिक राहतात. यात लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिला आदींचा समावेश आहे. त्यांना डोक्यावर छत मिळावे म्हणून महापालिकेने विरार येथे निवारा केंद्र सुरू केले आहे. तेथे ७० लोक राहतात. पावसाळ्यात देखील निवारा केंद्राचा आसरा नागरिक घेतात. तर वालीव व मोरेगाव भागात देखील निवारा केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी देखील अशा नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यामुळे बेघरांना डोक्यावर छत मिळणार आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून वसई-विरार महापालिका क्षेत्रात सोल्युशन या संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. ही संस्था रात्रीच्या वेळी फूटपाथ, रेल्वे स्थानकानजीक, सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्य भागात उघड्यावर जे नागरिक राहतात त्यांची संख्या मोजणार आहे. त्यात महिला, छोटी मुले तसेच जेष्ठ नागरिक किती आहेत याची वर्गवारी करून तो अहवाल केंद्र, राज्य शासनाकडे पाठवला जाईल. त्यानंतर नागरिकांची संख्या किती आहे, निवारा केंद्र किती असावीत, त्यांना कोणत्या सुविधा असाव्यात याचा अहवाल दिला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल शासनाकडून वसई विरार महापालिकेकडे येईल व त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने एक निवारा केंद्र उभारले असून दोन लवकरच सुरू होणार आहेत. सर्वेक्षणानंतर या तीन निवारा केंद्राची जागा अपुरी पडल्यास त्यात वाढ केली जाणार आहे.
छताविना उघड्यावर आपला संसार मांडणारे, एकाकी जीवन जगणाऱ्यांना मात्र यामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच ऋतूमानात त्यांची होणारी फरफट थांबण्यास मदत होणार असल्याने अनेक सामाजिक संस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. वसई, विरार शहरात २६ जुलैपर्यंत सर्वेक्षण होणार असून यामध्ये सर्वसाधारण तपशील, कौटुंबिक, सामाजिक स्थिती, निराधार, बेघरांची लोकसंख्या, आरोग्यासंबंधी माहिती नोंदविली जाणार आहे. निराधार किंवा बेघर आढळल्यास ७९९७००७१६७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.