कल्याण : रस्त्याची दयनीय अवस्था, जीवघेणा रेल्वेप्रवास, प्रदूषण, अनधिकृत रिक्षा थांबे, जागोजागी कचराकुंड्या अशा समस्यांचा वेढा डोंबिवलीभोवती पडला आहे. प्रशासनाचे प्रयत्न कमी पडत असून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अपयशी ठरल्याचा आरोप नागरीक करत आहे. या सर्व समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात मानवी साखळी केली. या चौकात अनधिकृत रिक्षा थांबे असल्याने सुरुवातीला मानवी साखळी करण्यास जागरूक नागरिकांना अडचण येत होती. त्यातच एका रिक्षाचालकाने जाणूनबुजून या ठिकाणी रिक्षा उभी केली होती. जागरूक नागरिकांनी यासंदर्भात वाहतूक पोलिसांचे लक्ष वेधले असता वाहतूक पोलिसांनी त्या रिक्षाचा फोटो काढला. काही वेळाने रिक्षाचालक वाहतूक पोलिसांच्या समोर रिक्षा घेऊन गेला, परंतु या रिक्षाचालकावर कोणतीही कारवाई केली नाही. ही रिक्षा हटल्यानंतर जागरूक नागरिकांनी चौकात मानवी साखळी करत प्रशासनाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीचा निषेध व्यक्त केला.
समस्या सोडविण्यासाठी मानवी साखळी
रस्त्याची दयनीय अवस्था, जीवघेणा रेल्वेप्रवास, प्रदूषण, अनधिकृत रिक्षा थांबे, जागोजागी कचराकुंड्या अशा समस्यांचा वेढा डोंबिवलीभोवती पडला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2019, 4:00 am